अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहत होते. अखेर शुक्रवारी (दि. १५ जानेवारी ) रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
यातच जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ३५ वर्षांनंतर शुक्रवारी नागरिकांनी मतदान केले. यावेळी ९१७ पैकी ८४३ म्हणजे ९३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकाधिकारशाहीच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी गावातील शिक्षक किशोर संबळे यांनी सात सदस्यांचे स्वतंत्र परिवर्तन पॅनेल उभे केले होते.
त्यामुळे सरपंच पोपटराव पवार यांनाही ग्रामविकास पॅनेल तयार करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे लागले. हिवरे बाजारमध्ये यापूर्वी १९८९ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली होती.
त्यानंतर पोपटराव पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर गावाने विश्वास टाकला. पोपटराव पवार यांच्या विरोधातील पॅनेलच्या उमेदवारांनी पोलिस संरक्षण मागितले होते.
गावातील राजकीय विरोधकांकडून जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. प्रत्यक्षात कुठलाही अनुचित प्रकार न होता मतदान शांततेत पार पडले. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved