आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्हणाले मतभेद विसरुन पुन्‍हा एकदा विकासासाठी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गावाच्‍या विकासाची चावी तुमच्‍या हातात आली आहे. सर्वांना विश्‍वासत घेवून नव्‍या गाव कारभा-यांनी मिळालेल्‍या संधीचे सोने करावे, समाजाच्‍या हितासाठी योजनांची अंमलबजावणी करा आणि ‘स्‍वयं: रोजगाराच्‍या निर्मितीतून गावे आत्‍मनिर्भर बनवा’ असे आवाहन भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी मतदार संघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्‍यांचा सत्‍कार आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या सोहळ्यास जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, शिर्डीचे नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर,

गणेश कारखान्‍याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, चेअरमन नंदु राठी, व्‍हा.चेअरमन प्रतापराव जगताप, विश्‍वासराव कडु, सभापती सौ.नंदाताई तांबे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपाचे उपाध्‍यक्ष अॅड.रघुनाथ बोठे, तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, शिर्डी शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे,

उपनगराध्‍यक्ष हरिषचंद्र कोते यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात हार,गुच्‍छांना फाटा देवून सर्व ग्रामपंचात सदस्‍यांचा सत्‍कार रोपे देवून करण्‍यात आला. शिर्डी मतदार संघात सुरु असलेल्‍या मोफत अपघात विमा योजनेतील लाभार्थ्‍यांना धनादेशाचे वितरण करण्‍यात आले.

आपल्‍या भाषणात आ.विखे पाटील म्‍हणाले की, या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने गाव कारभार हाकण्‍यासाठी सर्वांनिच दाखविलेली सक्रीयता महत्‍वाची होती. परंतू निवडणूकीत झालेले मतभेद विसरुन पुन्‍हा एकदा गावाच्‍या विकासासाठी आपल्‍याला कटिबध्‍द व्‍हावे लागेल.

गावाच्‍या विकासाचे केंद्र हे ग्रामपंचायतच असुन, विकासाच्‍या चाव्‍या आता ग्रामपंचायतीच्‍या हाती आल्‍या आहेत. मिळालेल्‍या संधीचा तुम्‍ही कसा उपयोग करता यावरच गावाचे गावपण आधोरेखीत होणार असल्‍याचे सुचित त्‍यांनी सुचित केले. ग्रामीण भागासाठी असलेल्‍या योजनांची परिपुर्ण माहीती करुन घेण्‍याचे आवाहन करतानाच

पंचायतराज व्‍यवस्‍थेत झालेल्‍या घटना दुरस्‍तीनंतर ५० टक्‍के महिलांना निर्णय प्रक्रीयेत आधिकार मिळाले आहेत. निवडून आलेल्‍या महिला सदस्‍यांनी स्‍वत: पुढाकार घेवून गाव कारभार करण्‍याची गरज व्‍यक्‍त करुन आ.विखे पाटील पुढे म्‍हणाले की, शिर्डी मतदार संघात गावांच्‍या विकासासाठी आपण कधीही निधी कमी पडु दिला नाही.

राजकीय मतभेद दुर सारुन विकासाची ही प्रक्रीया सुरु असल्‍यानेच आपल्‍या मतदार संघातील ग्रामपंचायती आणि पंचायत समितीचा गौरव देशपातळीवर झाला आहे. यामध्‍ये ग्रामसेवक, स्‍थानिक पदाधिकारी यांचेही योगदान मोठे असल्‍याचे नमुद केले. योजनांच्‍या अंमलबजावणीत आपला मतदार संघ हा राज्‍यात अग्रस्‍थानी आहे.

गावाच्‍या विकासाबरोबरच ग्रामीण भागात स्‍वयं रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होण्‍यासाठी सामुहीक प्रयत्‍नांची गरज आहे. कृषि क्षेत्राबरोबरच दुग्‍ध व्‍यवसायातील संधी आता शोधाव्‍या लागणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्‍यक्ष माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील म्‍हणाले की,

ग्रामपंचायतीच्‍या निवडणूका या स्‍थानिक पातळीवरील असतात त्‍यामुळे निवडणूकीचे निर्णय करण्‍याचे स्‍वातंत्र्य स्‍थानिक पदाधिका-यांना दिले होते. निवडणूकीत जय पराजय हे होत असतात, निवडणूकी नंतर पुन्‍हा एक होवून गावाच्‍या विकासाचा विचार करावा लागणार आहे. ग्रामपंचायतीमधुनच नेतृत्‍व करण्‍याची संधी ही मिळत असते.

ग्रामपंचायत ते लोकसभा ही लोकशाहीची साखळी असून, त्‍याचे तुम्‍ही पाईक आहात अशा शब्‍दात त्‍यांनी नवनिर्वाचित सदस्‍यांचा गौरव केला. जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील म्‍हणाल्‍या की, पुरुषांच्‍या बरोबरीनेच महिलाही आता ग्रामीण भागात नेतृत्‍व करण्‍यासाठी पुढे आल्‍या आहेत.

महिला सदस्‍या निवडून येतात पण कारभार पुरुष मंडळी पाहातात ही परिस्थिती आता बदलावी लागेल. गावात सक्षमपणे काम करण्‍यासाठी महिलांनी संघटीतपणे काम करुन विकासाच्‍या योजनांची अंमलबजावणी करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.भास्‍करराव खर्डे पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास उपसभापती ओमेश जपे, बाळासाहेब जपे, जि.प सदस्‍या सौ.रोहीण निघुते, सौ.कविता लहारे, पं.स सदस्या सौ.दिपाली डेंगळे, गुलाबराव सां‍गळे, कैलासराव तांबे, रामभाऊ भूसाळ यांच्‍यासह सर्व ग्रामपंचायत सदस्‍य, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Leave a Comment