टायटॅनिक बुडाल्याची घटना सर्वश्रुत आहे, पण त्याबद्दलची अस्वस्थ करून सोडणारी ‘ही’ तथ्ये तुम्हाला माहित आहेत का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- १९१२ मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले.

एकुण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे २ प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या.

दुसरी बाब , टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले.

टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण −२ °C इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो. या घटनेवर आधारित किती तरी पुस्तके, लेख प्रसिद्ध झाले. तसेच या घटनेवर आधारित ‘टायटॅनिक’ हा चित्रपट देखील खूप लोकप्रिय झाला.

या सर्व पुस्तकांच्या, लेखांच्या, माहितीपटांच्या माध्यमातून या बोटीच्या अपघाताशी निगडित अनेक तथ्ये आपल्यासमोर आली असली, तरी या अपघाताबद्दलची अशी अनेक तथ्ये आहेत, जी आजही फारशी सर्वश्रुत नाहीत. टायटॅनिक बोटीला होणार असलेल्या अपघाताचे पूर्वानुमान काही वर्षे आधीच लावले गेले होते.

एका लेखकाने आपापल्या कादंबरीच्या मार्फत, या अपघाताचे अचूक वर्णन केले होते. १५ एप्रिल १९१२ सालच्या त्या रात्री घडलेल्या अपघाताचे सविस्तर वर्णन या लेखकाने आपल्या पुस्तकामध्ये, अपघात घडण्यापूर्वीच अनेक वर्षे करून ठेवले होते. समुद्रमार्गाने सफरीसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी सावधानतेचा इशारा म्हणून हे पुस्तक लिहिले गेले होती, आणि आश्चर्य म्हणजे या पुस्तकामध्ये वर्णन केल्याप्रमाणेच अपघात घडला.

‘द रेक ऑफ टायटन’ असे या पुस्तकचे नाव निव्वळ योगायोग म्हणता येईल का? मॉर्गन रॉबर्टसन नामक या लेखकाने १८९८ साली हे पुस्तक लिहिले होते. म्हणजे टायटॅनिकला अपघात होण्याच्या चौदा वर्षे आधीच हे पुस्तक लिहिले गेले होते ! टायटॅनिक रात्रीच्या वेळी एका विशालकाय हिमनगाला धडकल्याने तिला अपघात झाला हे तथ्य आपल्या परिचयाचे आहे, मात्र बोटीवर टेहळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा हिमनग मुळातच खूप उशीरा दिसला, हे देखील वास्तव आहे.

अपघात घडून आल्याच्या केवळ सदतीस सेकंद आधी हा हिमनग दृष्टीला पडला असल्याने जहाज वळविणे किंवा अन्य मार्गाने अपघात टाळता येणे, किंवा हिमनग समोर असल्याची धोक्याची सूचना वेळेवर पोहोचविणे केवळ अशक्य होते. तसेच बोटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्बीण असून, त्यांनी त्याचा वापर आधीच केला असता, तर कोण जाणे, कदाचित हा अपघात घडला ही नसता, असे ही म्हटले जाते.

टायटॅनिक हिमनगाला टकराविण्याआधी काही काळ, ‘एस एस कॅलिफोर्निया’ या बोटीवरून, पुढे हिमनग असण्याची शक्यता असल्याची धोक्याची सूचना टायटॅनिकला देण्यात आली होती. पण टायटॅनिकवरील कर्मचाऱ्यांनी या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष तर केलेच, शिवाय टायटॅनिक इतके बळकट जहाज जगामध्ये अस्तित्वात नसून, ते कधीही बुडणार नाही अश्या पद्धतीने बनविले गेल्याचा संदेश उत्तरादाखल पाठविला होता.

टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला.

Leave a Comment