खुनाचा प्रयत्न करनाऱ्या आरोपींना 24 तासांत अटक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- रस्त्यात वाद घालू नका, वाहतूक थांबलीय असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघांनी एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

स्टेशन रस्त्यावरील सगम हॉटेलसमोर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कोतवाली पोलिसांनी या तिन्ही आरोपींना २४ तासांच्या आत बलेनो कारसह ताब्यात घेतले.

आदित्य ऊर्फ निरंजन श्याम अहिरराव (२६, राहणार काळेवाडी, पिंपरी चिंचवड), स्वप्निल राजेंद्र गाडे (२०, भीमनगर, पिंपरी चिंचवड) व अभिषेक नरसिंग माडगुळे (१९, राहणार ज्योजिबानगर, पिंपरी चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे तिघे सोमवारी मध्यरात्री त्यांच्या बलेनाे कारमध्ये स्टेशन रस्त्यावरून चालले होते. यावेळी त्यांचे व एका रिक्षाचालकाचे भर रस्त्यात वाद सुरू होते.

त्याचवेळी गोरख मारुती गोरे (२४, रा. शिवगंगा अपार्टमेंट) हे त्यांच्या मित्राबरोबर सायकलवरून चालले होते. आरोपी व रिक्षाचालकाचा वाद पाहून गोरे यांनी त्यांना वाद घालू नका, तुमच्यामुळे रस्त्यावरील वाहतूक थांबली असल्याचे त्यांना सांगितले.

आरोपींना त्याचा राग आल्याने त्यांनी गोरे व त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यातील एकाने चाकू काढून गोरे यांच्या कपाळावर वार केला.

याप्रकरणी गोरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.

Leave a Comment