…त्यांना शालिनी विखे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर ;-लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या बाबा ओहोळ यांच्यासारख्या निष्क्रिय अध्यक्षाने पक्षनिष्ठेच्या गोष्टी आम्हाला शिकवू नये.

ज्यांचा इतिहासच बंडखोरीचा आहे, त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. उलट ज्यांच्या कारकिर्दीत तालुक्यात पक्षाची वाताहत झाली त्यांनीच पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे,

अशी मागणी संगमनेरमधील विखे समर्थकांनी केली. संपूर्ण विखे परिवार भाजपवासी झाल्याने काँग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांच्या सदस्य व अध्यक्षपदाची मागणी केली होती,

त्याला संगमनेरमधील विखे समर्थक समजल्या जाणाऱ्या कॉग्रेसच्या वसंत देशमुख, संगमनेर मर्चंट बँकेचे माजी संचालक किशोर नावंदर व सोमनाथ कानवडे यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे उत्तर दिले.

जिल्हा परिषद अध्यक्ष विखे यांना पदावर ठेवायचे किंवा नाही हा अधिकार सर्वस्वी पक्षनेत्यांचा आहे. त्यामुळे ज्यांना या विषयावर बोलण्याचादेखील अधिकार नाही, अशा ओहोळ यांनी पत्रकबाजी करत स्वत:चे हसे करून घेतले.

ज्यांना स्वत:च्या गावची ग्रामपंचायत सांभळता आली नाही, त्यांनी विखे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी केवळ व्यक्तिद्वेष आणि वैफल्यग्रस्त भावनेतून केली आहे.

ओहोळ यांनी तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहताना काँग्रेस पक्ष ‘यशोधन’मध्ये अडकवून ठेवला. तालुक्यात कोणतेही संघटन उभे न करता केवळ ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक यांच्या दावणीला पक्ष बांधला.

परिणामी गत विधानसभा निवडणुकीमध्ये स्वत:च्या नेत्याचे मताधिक्य घटले याचीदेखील जाणीव ओहोळ यांना राहिली नाही.

तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना डावलत मर्जीतील ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, वाळूमाफियांना उमेदवाऱ्या दिल्या गेल्या. ओहोळ यांच्या भूमिकेमुळेच तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाल्याचा आरोप करण्यात आला.

Leave a Comment