शेतकऱ्यांना पाणी मिळेल,संयम ठेवावा – माजीमंत्री पाचपुते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदा – पुणे जिल्ह्यातील येडगाव धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी संपले आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन बंद करावे, असे पत्र पुणे जिल्ह्यातील एका आमदाराने दिले. त्यामुळे भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता स्वप्नील काळे यांना आज कुकडी कार्यालयात घेराव घातला.

कुकडी प्रकल्पातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले. कर्जत, करमाळा तालुक्‍यांसाठी सुमारे आडीच टीएमसी पाणी वापरले. तरीही टेलकडील भरणे झाले नाही. अशा परिस्थितीत श्रीगोंदा तालुका होरपळून गेला आहे. पाणी कधी सुटणार, या चिंतेने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

अशा परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील आमदाराने कुकडीचे आवर्तन बंद करा, असे पत्र दिले. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत. त्यांनी कुकडीचे आवर्तन सुरू राहावे, म्हणून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली कुकडीचे अधीक्षक अभियंता काळे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांनी पाण्याअभावी येत असलेल्या समस्या कथन केल्या.

यावेळी सभापती शहाजी हिरवे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, गणपतराव काकडे, मिलिंद दरेकर, सतीश पोखर्णा, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, पोपटराव खेतमाळीस, शंकर कोठारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

पाऊस नसल्याने श्रीगोंद्यातील पिके धोक्‍यात आली आहेत. कुकडीचे आवर्तन लांबले आहे. येडगाव धरणातील पाणी कमी झाले आहे. येडगावमध्ये माणिकडोह धरणातील पाणी सोडून खरिपातील पिकांना जीवदान देण्यासाठी आपण जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांची भेट घेणार आहोत. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल. शेतकऱ्यांनी संयम ठेवावाबबनराव पाचपुते, माजी मंत्री

Leave a Comment