विकासकामांमुळेच जनता माझ्यासोबत – आ.राहुल जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदा: श्रीगोंदा -नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून पाच वर्षांत श्रीगोंदा नगर तालुक्यात मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत, त्या विकासकामांमुळेच जनता आपल्यासोबत असल्याचे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुरेगाव ते घुटेवाडी या २.५० कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आ. जगताप यांनी बोलताना सांगितले की, मतदारसंघातील जनतेने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा मत मागणार आहे. आ. जगताप यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुरेगाव ते घुटेवाडी (२.५० कोटी) तसेच घुटेवाडी ते कोल्हेवाडी (२० लक्ष) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे, घनशाम शेलार, हरिदास शिर्के, ऋषिकेश गायकवाड, बाळासाहेब उगले, हेमंत नलगे, विश्वास थोरात, अंकुश रोडे, सतीश गव्हाणे, धोंडिबा लगड, माऊली हिरवे, सुभाष काळोखे, संतोष लोखंडे, दत्ता दारकुंडे, राजू रोडे, विजय लोखंडे, संदीप घुटे, विजय दारकुंडे, भाऊसाहेब गव्हाणे, किशोर घुटे, तसेच सुरेगाव व घुटेवाडी येथील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी, ज्यांना ३५ वर्षे काहीही करता आले नाही ते दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेत आहेत, असा टोला माजीमंत्री पाचपुते यांचे नाव न घेता लगावला.

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्रीत राहणार असून, आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. रस्ता कामास सुरुवात झाल्याने सुरेगाव व घुटेवाडी ग्रामस्थांनी आ. जगताप यांचे आभार मानले.

Leave a Comment