पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर प्रश्नी सोडले मौन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नाशिक : अयोध्येतील राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना काही बोलघेवडे लोक वायफळ बडबड करीत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर प्रश्नी मौन सोडले.

प्रभू रामचंद्रांसाठी तरी डोळे मिटून भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, अशी हात जोडून विनंती करतो, असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत बहुमत नसतानादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर, प्रगतशील आणि राज्याला समर्पित सरकार चालवून महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे.

महाराष्ट्राच्या चौफेर प्रगतीसाठी पुन्हा एकदा भाजपाला विजयी करा, असे सांगताना ‘चला पुन्हा आणू या, आपले सरकार!’ असे आवाहनही मोदींनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची मुक्तकंठाने प्रशंसा करणाऱ्या मोदींनी काश्मीरबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा शरसंधान साधले.

स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी शिवरायांनी मावळ्यांना दिलेली पगडी म्हणजे महाराष्ट्राची ओळख. आजच्या सभेत हीच आकर्षक पगडी पंतप्रधानांना देण्यात आली.

नुसता सत्कार म्हणून नव्हे, तर नुकतेच भाजपवासी झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी ही पगडी पंतप्रधानांना घातली. मोदींनीही शेवटपर्यंत ही पगडी मस्तकावर ठेवत पगडीचा गौरव केला. उदयनराजे यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींनी आदराने पगडी मस्तकावर धारण केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

ही पगडी स्वीकारताना पंतप्रधान मोदी हे नतमस्तक व भावुक झाले होते. संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी पगडी मस्तकावरच ठेवली होती. भाषण करतानाही डोक्यावर पगडी असल्याचा आदराने उल्लेख करीत मोदी म्हणाले, छत्रपतींच्या वंशजांच्या हस्ते पगडी मिळाल्याने सन्मान तर झाला आहेच शिवाय जबाबदारीही वाढली आहे.

हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असल्याचा आवर्जून उल्लेख करीत, मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन केले.

Leave a Comment