आ. राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर श्रीगोंद्यात उलटसुलट चर्चेला ऊत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदे:- राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भावनिक होऊन आपले समर्थक व कार्यकर्त्यांची माफी मागितली. ‘मी आपली मनापासून माफी मागतो’ अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकली आहे. ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. भाजपचे उमेदवार म्हणून बबनराव पाचपुते यांचे नाव जाहीर होताच मतदारसंघातील राजकारण वेगाने बदलले.

त्याआधी खुद्द आमदार जगताप यांच्यासह राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्याकडून भाजपच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू होती. मात्र, चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून लढण्याऐवजी उमेदवारी नको, म्हणून स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. आमदार राहुल जगताप मैदानातून बाहेर पडल्याचे गुरूवारी स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी फेसबुक पोस्टद्वारे समर्थकांची माफी मागितली.

मी आपली मनापासून माफी मागतो. माझ्याकडून आपल्या खूप अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बापू (शिवाजीराव नागवडे) व तात्या (कुंडलीकराव जगताप) यांचे विचार सदैव सोबत घेऊन या पुढेही कायम आपल्या सोबत राहीन. पुढचा काळ आपलाच आहे. ज्येष्ठ मंडळींनी आशीर्वादाचा पाठीवरचा हात कायम ठेवावा. तरूणांनी या मित्राला अशीच मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या या पोस्टनंतर समर्थक व कार्यकर्त्यांकडून ‘मी तुमच्या सोबत आहे’ अशा पोस्टचा महापूर आला. दरम्यान, आमदार राहुल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर श्रीगोंद्यात उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

Leave a Comment