वैभवशाली अहमदनगरच्या विकासासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष हाच सक्षम पर्याय – डॉ.कॉ.भालचंद्र कांगो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वैयक्तिक दोषी नसताना ईडी मार्फत चौकशी लावून त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी वेळप्रसंगी कायद्याची व्याख्या बदलली गेली. मुख्यमंत्री, अमित शहा, पंतप्रधान यांनी जर घोटाळे केले असतील तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांना दोषी धरणार का असा सवालही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

कांगो नगरला आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगर विधानसभा मतदार संघाचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बहिरनाथ वाकळे, विडी कामगार नेते कॉ.शंकर न्यालपेल्ली, राज्य सहसचिव अ‍ॅड.सुभाष लांडे, अर्शद शेख, अंबादास दौंड, नीलिमा बंडेलू आदी उपस्थित होते.
भालचंद्र कांगो म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये राजकारण अतिशय वेगळे आहे, इथे कोणताही पक्ष पाहिला जात नाही तर तर स्थानिक गट, तट पाहून राजकारण केले जाते. भावनिक मुद्दा आणि जातीपातीचे राजकारण केले जाते.

राष्ट्रवादी एकीकडे भाजपला विरोध करते मात्र शहराच्या महापालिकेत भाजपला साथ देऊन त्यांची सत्ता आनते. तर पक्षातून लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यास विरोधी पक्ष नेते पक्ष बदलतात अशी सगळी विचित्र अवस्था या नगरमध्ये नेहमीच पाहायला मिळते. पाणी असलेला व पाणी नसलेला अशा दोन विभागात जिल्हा विभागला गेला आहे. जिल्हा विभाजनाचा वारंवार मुद्दा उपस्थित केला जातो. आघाडीच्या सरकारला दोष देणार्‍या युतीच्या सरकारला त्यांच्या सत्ता काळात जिल्हा विभाजन करता आले नाही. दुसरीकडे शेअर बाजारांमध्ये सर्वाधिक पैसा नगर जिल्ह्यातून गुंतवणूक होते. तरी देखील राजकीय इच्छाशक्ती अभावी जिल्ह्याचा विकास खुंटला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला.

काश्मीरची वस्तुस्थिती वास्तविक पाहता वेगळी आहे. 370 कलम हटवलं याचा कांगावा आता सत्ताधारी करू लागले आहेत. मात्र काश्मीरचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तेथील विरोधी पक्षनेते तुरुंगात आहे. भावनिक प्रश्‍न उपस्थित करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार भाजप सरकार करीत आहे. सध्याच्या सरकारची आर्थिक धोरणे अत्यंत चुकीचे आहे. परदेशी व्यापाराला चालना देण्याचा त्यांचा घाट आहे. स्थानिक व्यापार त्यामुळे तोट्यात गेला आहे. देश संकटातून बाहेर काढण्यासाठी आता सवलतींचा पाऊस पाडला जात आहे. कर्मचार्‍यांना पाच टक्के महागाई भत्ता आणि शेतकर्‍यांसाठी सवलती देण्याचे सत्र सुरु आहे. मात्र या उपाययोजना तुटपुंज्या आहेत. याचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने शेतकर्‍यांना पीक विमा दिला असल्याचे सांगत आहे. मात्र पिक विमा कंपन्यांना किती पैसे दिले? हे सरकार सांगत नाही. 2005 साली सरकारने 71 हजार कोटींची कर्जमाफी दिलेली होती. मात्र कर्जमाफी देऊन प्रश्‍न सुटत नाही. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळाल्यास बदल घडणार आहे. नगर जिल्हा सहकारचा जिल्हा आहे. मात्र गब्बर झालेल्या काही नेत्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

कॉ.बहिरनाथ वाकळे यांनी शहरातील युवक आजी-माजी आमदारांच्या गटात विभागले गेले आहेत. दोन्ही युवकांच्या टोळ्या एकमेकाच्या जीवावर उठले असून, युवकांवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. या सुडाच्या राजकारणापायी अनेक युवकांचे कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. यामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याने विकास खुंटला आहे. जागृक नागरिकांसाठी भाकपने पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मानसिकता बदलून योग्य उमेदवाराला निवडून देण्याची वेळ आली असून, शहराच्या विकासासाठी भाकप कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.


Leave a Comment