श्रीनगर : सरकारने सोमवारी तब्बल ७२ दिवसांनी काश्मीर खोऱ्यातील ४० लाखांहून अधिक पोस्टपेड मोबाईल ग्राहकांची सेवा सुरू केली. यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्यानंतर प्रथमच येथील नागरिकांना आपले कुटुंबीय, मित्र परिवार व आप्तेष्टांशी संवाद साधता आला. सरकारने मोबाईल सेवा सुरूकेली असली तरी येथील ‘इंटरनेट’सेवेला अद्याप हिरवा कंदील दाखवला नाही. त्यामुळे तूर्तास तरी काश्मिरींना समाज माध्यमांद्वारे बाह्यजगताशी संवाद साधण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे..
प्रशासनाने गत शनिवारीच खोऱ्यातील पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली होती. तद्नुसार, सोमवारी दुपारी काश्मीरमधील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. तद्नंतर खोऱ्यातील सर्वच नागरिक आपल्या नातेवाइकांशी मोबाईलवरून संवाद साधताना दिसून आले. गत ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे २ केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्यात आले होते. तेव्हापासूनच येथील मोबाईल सेवा विस्कळीत झाली होती. ‘सद्य:स्थितीत केवळ पोस्टपेड मोबाईल सेवाच सुरू करण्यात आली आहे.
आता नागरिकांना फोन कॉल व एसएमएस सुविधेचा लाभ घेता येईल; पण व्हॉट्सॲपसह २५ लाखांहून अधिक प्रीपेड मोबाईल फोन व अन्य इंटरनेट सुविधा तूर्तास बंदच राहील,’असे प्रशासनाने यासंबंधी स्पष्ट केले. खोऱ्यातील कनेक्टिव्हिटी १२ ऑगस्ट रोजी ईदच्या ऐन तोंडावर खंडित करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी ही सेवा पूर्ववत झाल्यानंतर नागरिकांनी प्रथम एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ‘हा दिवस आमच्यासाठी ईदहून कमी नाही.
जागतिकीकरणाच्या काळात गत २ महिन्यांपासून आमचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला होता,’ असे खोऱ्यातील निगहत शाह नामक एका व्यक्तीने सांगितले. जुन्या शहरात राहणाऱ्या बशरत अहमद यांनीही मोबाईल सुरू झाल्यानंतर लगेचच आपले मित्र व नातेवाइकांना फोन करण्यास थोडाही विलंब केला नाही. त्यांनी एका तासाच्या आत तब्बल ३० फोन कॉल केले. ‘मी ७० दिवसांपासून माझ्या नातेवाइकांशी चर्चा केली नव्हती. मला त्या सर्वांना आम्ही जिवंत असल्याचे सांगायचे आहे,’ असे ते म्हणाले.
- PM Surya Ghar Yojana: घराच्या छतावर सोलर रूप-टॉप बसवा आणि 300 युनिट वीज मोफत मिळवा! अशा पद्धतीने करा घरबसल्या अर्ज
- Tourist Place: उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात रेल्वेने प्रवास करून भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या! प्रवासाचा मिळेल सुखद आनंद
- SBI New Rule: स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता ‘या’करिता द्यावे लागतील जास्त पैसे! स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर हे वाचाच….
- Traffic Rule: तुम्हाला माहित आहेत का ‘हे’ तीन महत्त्वाचे वाहतुकीचे नियम? यामध्ये तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत त्रास
- शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !