त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी: शहरातील नागरिकांचे सर्व प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सोडवू. सत्ता असताना अनेक वर्षात नगरपालिकेची साधी पाणीपुरवठा योजना करता आली नाही, त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते. अशी टीका आ.शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर केली.

राहुरी येथे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी पेठेतून प्रचार फेरी काढली. यावेळी नागरिकांशी संपर्क साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंर्त्यांकडे पाठपुरावा करून राहुरीची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र त्यांनी या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

राहुरी तालुक्यातील तनपुरे यांच्या पूर्वजांनी सुरू केलेल्या विविध सहकारी संस्था बंद पडण्याचे काम केले. आता अस्मिता जपण्याचे सांगताना अस्मिता ही फक्त तनपुरे कुटुंबापूरतीच आहे का? इतर कोणाचे योगदान काहीच योगदान नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवडणूक आली की मग जनतेचा कळवळा दाखवायचा अशी त्यांची पध्दत आहे. मात्र जनता आता सर्व काही ओळखून आहे. २०१६ ला राहुरी नगरपालिका निवडणुकीत राहुरी स्मार्ट सिटी बनविण्याचे आश्वासन नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिले, मात्र प्रत्यक्षात काय दिवे लावले?.

शहरातील पिण्याचे पाणी, कचरा, रस्त्यांचा प्रश्न अजून सोडवता आला नाही. त्यांनी तालुक्यात किती विकासकामे झाली याचा नीट अभ्यास करावा. गेल्या पाच वर्षांच्या काळात नळवंडे धरण कालवा, मुदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून अनेक भरीव विकासकामे झाली. असे आ.कर्डिले म्हणाले..

राहुरी नगरपालिका निवडणुकीत राहुरीच्या सर्वांगीन विकासासाठी बोटक्लब, बाह्यवळण रस्ता, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, स्काय वॉक, चौक सुशोभीकरण, व्यापारी संकुल, घरकुल योजना, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, नाट्यगृह, स्वच्छता व आरोग्य रुग्णालय, स्वागत कमान या विकासपर्वाची नवी सुरुवात करण्याची ग्वाही नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी दिली होती.

यातील किती कामे आतापर्यंत पूर्ण झाली अथवा सुरु आहेत. याचे आत्मपरीक्षण करुन तनपुरे यांनी जनतेसमोर जाहीर करावे. असे आव्हान देतानाच नि्क्रिरय कोण आहे. हे राहुरीतील जनतेला ठावूक असल्याची टीका राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी केली.

ते म्हणाले की, नगराध्यक्ष तनपुरे यांनी शहरातील जनतेला विकास पर्वाची अनेक स्वप्न दाखवीली होती. मात्र आज शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डेंग्यू, चिकणगुन्या यासारख्या आजारांनी नागरीक त्रस्त झाले आहेत. शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. विकासाचा बोजवारा केला आहे.स्वागत कमान व स्कायवॉक कुठे दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment