भाजप-सेनेतील वादाबाबत आण्णा हजारे म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर :- राज्यात भाजप-सेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष केवळ सत्ता व पैशांसाठी असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी केली.

राज्यात सत्तास्थापनेबाबत भाजप व सेनेेमध्ये एकमत होत नसल्याचे हजारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणुकीत तर त्यांनी गळ्यात हात टाकले होते ना? मग आता भांडण कशासाठी सुरू आहे? याचा अर्थ त्यामागे स्वार्थ आहे.

सत्ता व पैशांसाठी संघर्ष सुरू आहे. एकदा गळ्यात हात टाकला तर तो नेहमी गळ्यातच राहिला पाहिजे. आता दोघे सत्तेसाठी भांडणे करू लागले आहेत, ते समाज व देशाच्या हिताचे नाही.

राज्यातील बहुतांश भागांत परतीच्या पावसामुळे पूर तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई देण्यास सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे.

आपल्या कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो यासारखे लांच्छनास्पद काय आहे? ही अपमानास्पद गोष्ट नाही का? शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यापेक्षा राज्यात सध्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू आहे.

सत्तेसाठी सध्या सुरू असलेल्या वाटाघाटीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न रेंगाळले आहेत. त्यांच्या सत्तेच्या वाटाघाटीनंतर वेळ पडली तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आपण लक्ष घालू, असेही हजारे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment