अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : नगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

नगर शहराच्या हद्दीतून जाणारा नगर-मनमाड महामार्ग अत्यंत खराब झाला आहे. त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यांची तातडीने दुरूस्ती करावी.नगर शहर व नागापूर एमआयडीसीला जोडणारा हा महामार्ग असून येथून दररोज हजारो वाहने जातात.

कामगारांना सुद्धा याच महामार्गाचा उपयोग करावा लागतो. पत्रकार चौक ते एमआयडीसीपर्यंत अनेक ठिकाणी हा महामार्ग खराब झाला आहे. पत्रकार चौकाजवळ,प्रेमदान चौक ते सावेडी नाका या दरम्यान असणाऱ्या नाल्यावरील पुलाजवळ खड्डे पडले आहेत. मुरुम टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु शहरामध्ये सातत्याने होणाऱ्या पावसामुळे येथे चिखल झाला आहे.

तसेच सावेडी नाका, बोल्हेगाव फाटा या ठिकाणीही खड्डे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते.त्यातच रात्रीच्या वेळी बहुतांश पथदिवे बंद असल्यामुळे अंधारातून प्रवास करणे अधिकच जोखमीचे झाले आहे.

महामार्गावरील खड्डे, अंधार यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. तरी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून लवकर या महामार्गाची दुरुस्ती करून पथदिवेही सुरू करण्याची आवश्यकता आहे

Leave a Comment