विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाथर्डी : विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढत असताना तोल गेल्याने वैभव भागवत फुंदे (वय १४ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी -कोरडगाव रोडवरील फुंदेटाकळी येथे घडली. वैभव हा शनिवारी शेतात कापूस वेचणीसाठी गेला होता. 

त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. विहिरीतून पाणी काढत असताना त्याचा तोल गेल्याने विहिरीत पडला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर लगेचच तरुणांनी विहिरीत उड्या मारून वैभवचा शोध घेण्यास सुरवात केली. 

परंतू विहिरीला पाणी जास्त असल्याने तरुणांना वैभवचा शोध लागत नव्हता. नागरिकांनी तातडीने चार वीजपंप लावून पाणी उपासण्यास सुरवात केली, परंतू त्यात बराच वेळ गेल्याने अखेर वैभवचा मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी होती. घटनेसंदर्भांत प्रशासनाला तत्काळ माहिती देऊनही उशिरापर्यंत प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळावरपोहचली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री दहा वाजाता मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले. रात्री उशिरा भुतेटाकळी येथे अंत्यसंस्कर करण्यात आले. दरम्यान, वैभवाचे आई -वडील हे शेती करतात. या घटनेमुळे फुंदेटाकळी गावावर शोककळा पसरली आहे.

या घटनेबाबत ग्रामस्थांनी महसूल प्रशासनातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. सात तासानंतर एकही कर्मचारी घटनास्थळी आला नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागात सुट्टीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. या दिवशी कोणावर जबाबदारी होती, याची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रमस्थांनी केली आहे.

Leave a Comment