अपघातात मृत्यू पावलेला तरुण परत आठ दिवसांनी जिवंत होवून घरी आला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अपघातात मृत्यू पावलेला तरुण परत आठ दिवसांनी जिवंत होवून घरी आला… होय ! तुम्ही बरोबर बातमी वाचलीय ही घटना झालीय नंदुरबार जिल्ह्यात.

अपघातात निधन झालेल्या एका युवकावर अंत्यसंस्कार होऊन त्याच्या दहाव्याचा कार्यक्रम १ फेब्रुवारीला होणार होता. मात्र, त्याआधीच तो घरी परतल्याने सर्वच अचंबित झाले.

मुलगा समजून कुटुंबाने एका अनोळखी तरुणावर अंत्यसंस्कार केले याचा उलगडा तो तरुण प्रत्यक्षात घरी आल्यानंतर झाला. चित्रपटाच्या रहस्यमय कथेप्रमाणे हा प्रत्यक्षात घडल्याचे समोर आले आहे.

शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे राहणाऱ्या नारायणसिंग आनंदसिंग गिरासे (३८) याचा शिरपूर महामार्गावर सावळदा (ता.शिरपूर) येथे २३ जानेवारीला रात्री नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला होता.

यात त्याचे निधन झाल्याची माहिती तेथील एका हॉटेल चालकाने नारायणच्या वडिलांसह नातेवाइकांना कळवली. त्या युवकाच्या चेहऱ्यावरून वाहन गेल्याने चेहऱ्याचा पूर्णत: चेंदामेंदा झाला होता.

त्यामुळे त्याची ओळख पटणे कठीण झाले होते. मात्र, सावळद्याच्या एका हॉटेल मालकाने नारायण अपघातात ठार झाल्याचे सांगितल्याने तो नारायणच असावा, अशी खात्री बाळगत पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हालचाली झाल्या.

विशेष म्हणजे शिरपूर येथे शवविच्छेदन करून एका कापडात नारायणच्या नातेवाइकांना युवकाचा मृतदेह देण्यात आला. त्यामुळे २४ जानेवारीला काथर्दे दिगर येथे त्या (नारायण समजून)मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.

त्यानुसार १ फेब्रुवारीला नारायणचे दहावे करण्यात येणार होते. मात्र, नारायण गिरासे हा बभळाज फाट्याजवळ दिसल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांना मिळाली.

नारायण ३० जानेवारीला काथर्दे दिगर गावात दाखल झाला. त्यामुळे ज्याचे अंत्यसंस्कार केले तो नारायण चक्क जिवंत असल्याचे कळाले. त्याला पाहून वडील आनंदसिंग गिरासे यांचा आनंद गगनात मावेनासे झाला होता.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment