स्वच्छतेचे वळण लावण्यासाठी तब्बल सोळा हजार रुपयांचा दंड वसूल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी होत आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने पुरेसा जनजागर करीत कृतिशील मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, काही नाठाळांना स्वच्छतेचे वळण लागण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करीत शहरातील तीनही बसस्थानकात रापमंच्या नियंत्रकांनी दंडात्मक कारवाया केल्या.

तब्बल सोळा हजार रुपयांचा दंड स्वच्छतेचे वळण लावण्यासाठी वसूल करण्यात आले आहे. बसस्थानकांचे रुपडे बदलले असून, स्वच्छता अभियानाचे नागरिकांच्या सहयोगातून पाऊल पुढे असे चित्र या निमित्ताने आढळून येत आहे. मागील दोन महिन्यांच्या अवधीत स्वच्छ भारत अभियान शहरासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे गुणांकन झाल्यानंतर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना केंद्र सरकारकडून पुरस्कारीत करण्यात येणार आहे.

पुरस्काराची रक्कम लाखो रुपये असणार आहे. या परीक्षणात गाव जर उत्तीर्ण झाले, तर निधीसह सन्मानाला पात्र ठरेल. हा सन्मान प्रशासकीय यंत्रणेचा नसून गावातील गावकऱ्यांचा सन्मान मानला जाणार आहे. तसेच पुरस्काराचा निधी स्थानिक विकासाच्या कामासाठी खर्ची पडणार आहे. हे लक्षात घेऊन स्वच्छ भारत अभियानात जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. याची अंमलबजावणी निरंतर सुरू आहे.

जनजागृतीची आवाहने करीत या मोहिमेत नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर जोडण्यात आला. तसेच नाठाळांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आल्या. या मोहिमेच्या अनुषगांने हमखास कचरा होणाऱ्या जागा आणि वर्दळीचे ठिकाणे यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले.

शहरात स्वस्तिक, माळीवाडा, तारकपूर बसस्थानके आहे. या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. दोन महिन्यांपूर्वी उघड्यावर कचरा टाकणे, स्वच्छतागृहाचा वापर न करणे, उघड्यावर लघुशंका करणे, यामुळे बसस्थानकांचा अवतार कळाहीन होता. स्वच्छ भारत अभियानादरम्यान जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी विभाग नियंत्रक विजय गिते यांच्या सहयोगाने बसस्थानकांचे रुपडे बदलण्याचा संकल्प केला.

Leave a Comment