‘त्या’ भगिनीचा मृत्यू राज्यासाठी लाजीरवाणा – उपमुख्यमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने 3 फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक तरुणीवर उपचार करत होते. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.

यासंदर्भात संतप्त प्रतिक्रीया देताना अजित पवार म्हणाले की, आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल. पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिले पाहिजे.

या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट वसियांच्या दुःखात सहभागी असल्याचे पवार यांनी सांगितले.

Leave a Comment