लॉकडाऊन काळात कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६३ हजार गुन्हे दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि.२२ : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६२ हजार ९८७ गुन्हे दाखल झाले आहेत तर १३ हजार ८६९ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४४ हजार १३५ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७४ हजार ६१६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर ‘क्वारंटाईन’ असा शिक्का आहे, अशा ५९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०६७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ४१ लाख (२ कोटी ४१ लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

१२ अधिकारी व ५२ पोलिसांना बाधा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारीदेखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने १२ पोलीस अधिकारी व ५२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १३४ घटनांची नोंद झाली असून यात ४७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment