थोडंसं मनातलं : सणउत्सवावर कोविड-19 चा प्रादुर्भाव – ॲड शिवाजी अण्णा कराळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आषाढ आणि श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मियांचे सणउत्सवाला सुरूवात होणारे महिने. या महिन्यात आषाढी एकादशी, नागपंचमी, रामनवमी , वटसावित्री पौर्णिमा तसेच गणेशोत्सव येतात. तसेच याच महिन्यात मुस्लिम बांधवाचे रमजान ईद, बकरी ईद, मोहरम इत्यादी सणउत्सव येतात. परंतु सध्या सरकारने कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशभर लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीत सर्व धर्मियांचे धार्मिक स्थळे पुर्ण पणे बंद आहेत.

तसेच धार्मिक यात्रा, जत्रा आणि पर्यटन स्थळे, किर्तन, भजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम सुद्धा बंद असल्याने सर्व धार्मिक सणउत्सवावर विरजण पडले आहे. आता तर पोलिस प्रशासन यांनी येणारे बकरी ईद, मोहरम आणि गणेशोत्सव सुध्दा अगदी साध्या पणाने व घरगुती स्वरूपातच साजरे करावेत असे आवाहन केले आहे. या अगोदर सुद्धा महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि रमजान ईद शासकीय नियमाचे काटेकोर पालन करूनच साजरे केले आहेत.

अहमदनगर मधील शिस्तप्रिय नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन , समाजसेवक, लोकप्रतिनिधी , विविध मंडळाचे पदाधिकारी व सर्व धर्मियांचे चे नेते मंडळी यांनी सणासुदीच्या व लाॅकडाऊन च्या काळात खुपच चांगले काम केले आहे. कुठे ही गालबोट लागले नाही व लागू दिले नाही. हा कोविड-19 कधी एकदाचा जातोय आणि पुन्हा पुर्वीच्या प्रमाणे जनजीवन सुरळीतपणे चालू होईल अशीच वाट जनता बघत आहे. आता पहिल्या सारखे नागराजाचे महिला वारूळावर जाऊन पूजन करणार नाहीत की नागोबाला दूध पाजणार नाहीत.

श्रावण महिना चालू झाला की पाचव्या दिवशी नागपंचमी येते. अनेक नवविवाहित मुली आपल्या माहेरी नागपंचमी साठी येतातच. मग माहेरी आलेल्या सगळया मैत्रिणी एकत्रित येऊन फेर धरतात आणि नागोबाचे गाणे म्हणून आनंद साजरा करतात. तसेच खेडेगावातील झाडावर झोका बांधून त्याचा आनंदही घेतला जातो. तरूण मुले पतंग उडविण्यात मग्न असतात तर घरातील आई आपल्या कुटुंबियांना गोडधोड जेवण बनविण्यात मग्न असते. नागपंचमी संपल्यावर श्रावण महिन्याचा शेवट दिवस म्हणजे बळीराजा साठी आनंदाचा “बैलपोळा” हा सण.

या दिवशी मनोभावे बैलाचे पुजन करून त्याला गोडधोड खायला घातले जाते. तसेच बकरी ईद आणि मोहरम हे सुद्धा सर्व धर्मिय मिळून साजरे करतात, गणेशोत्सवाचा थाट तर काही औरच असतो. या मोहरम व गणेशोत्सवावर अनेक लोकांचे कुटुंब अवलंबित असते. परंतु आता हे सण साजरे करता येणार नाहीत. संचारबंदी असल्याने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. त्यामुळे ख-या अर्थाने सणउत्सवाला या कोरोना मुळे पायबंद बसला आहे. मित्रांनो, आता हे दिवस कधी संपणार हे कुणालाच माहित नाही परंतु आपण जर व्यवस्थित पणे शासकीय नियमाचे काटेकोर पालन केले

तर निश्चितच आपण कोविड-19 चा पराभव करू शकतो यात शंकाच नाही. जनता सुरक्षित रहावी म्हणून प्रशासनाचे बरोबरीने आपण सुद्धा सतर्क राहिले पाहिजे असे वाटते. सध्या राज्यात अनलाॅकडाऊन भाग 2 सुरू आहे तसेच 31 जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. जर हे दिवस लवकरच संपले पाहिजेत असे वाटत असेल तर आपण कामधंदा करताना, व्यवसाय आणि नोकरीला जाताना शासकीय सूचना काटेकोर पणे पाळल्या पाहिजेत

तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. सध्या कोविड-19 हा कोणत्याही सर्व सामान्य जनतेला न परवडणारा आजार आहे. आपल्या बरोबरच आपल्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे. महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी आणि सणउत्सव तर पुन्हा पुन्हा येतच राहतील. आपण त्या नंतर ही चांगले प्रकारे साजरे करू शकतो पण प्रथम माणूस सुरक्षित राहिला पाहिजे. सध्या लाॅकडाऊन मुळे भेडसावणारे अनेक प्रश्न निर्माण झालेत. अनेक लोकांना अर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत हे पण सत्य आहे.

तरीही प्रशासनाने लोकांना अर्थिक समस्या निर्माण होऊ नये तसेच उपासमारीच्या संकटांना सामोरे जावे लागु नये बरेच उद्योग व्यवसाय आणि छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व धर्मिय तमाम नागरिकांना विनंती आहे की, कृपया सर्व सणउत्सव घरीच साजरे करावेत तसेच आपल्या मुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती आहे . सध्या तरी कोविड-19 ने सर्व धर्मियांचे धार्मिक सणउत्सवावर विरजण टाकले आहे. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. घरीच रहा सुरक्षित रहा.

ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545

Leave a Comment