दमदार पावसाने उभ्या पिकांचे नुकसान ; बळीराजा संकटात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे.

अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.

या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील साकतखुर्द, वाळकी, भोरवाडी, वाटेफळ, दहिगाव, वडगाव तांदळी,

रुईछत्तीसी आदी भागात शेतात पाणी साचून कपाशी, मका, बाजरी, मूग, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी सुरू झाली आहे.

दहिगाव, साकत भागात पाऊस व जाेराच्या वाऱ्याने मक्याचे पीक भुईसपाट झाले. हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे.

उभ्या पिकांचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. तशी मागणी देखील परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment