Blog :नि:स्वार्थी, प्रामाणिक व आदर्श नेतृत्व : आशुतोष काळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- चारित्र्य, कर्तृत्व, दांडगा जनसंपर्क व दिलेला शब्द पाळणे या गोष्टींबरोबरच अमेरिकेत राहून घेतलेले उच्च शिक्षण व हाती घेतलेलं काम तडीस लावण्यासाठी केलेल्या योग्य नियोजनाच्या कार्यपद्धतीमुळे यशस्वी राजकारणी म्हणून आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पाहिले जाते.

सहकारी साखर कारखानदारी पुढे अनेक संकट असतांना कर्मवीर शंकरराव काळे शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना तोटामुक्त करून दाखवत सहकारी साखर कारखानदारीपुढे आदर्श ठेवला आहे.

शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिवधनुष्य खांद्यावर घेत विकास कामांची एकेक वीट रचत आहेत. सत्ता असतांना विकासप्रक्रिया कशी चालवायची असते याचा वस्तुपाठ आमदार आशुतोष काळेंनी घालून दिला आहे.

आज त्यांचा वाढदिवस यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. माणसाने कुणाच्या पोटी जन्माला यावं, हे आपल्या हातात नसलं, तरी ज्या कुटुंबात आपण जन्माला आलो, त्या परिवाराच्या सदगुणांचे वारसदार होणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असत.

शिक्षण क्षेत्रातील आधुनिक भगीरथ शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा आशीर्वाद व कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे परिवाराचा आदर्श समाजकारणाचा वारसा आशुतोष काळे पुढे चालवत आहेत.

नेतृत्व कशाला म्हणायचे व नि:स्वार्थी, प्रामाणिक आणि आदर्शवत नेतृत्व कसं असावं याचा परिपाठ आशुतोषदादांनी तरुणाईपुढे ठेवला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून जनतेच्या प्रत्येक प्रश्नाची दखल घेत मागील पाच वर्षात सातत्याने जनतेसोबत राहून,

जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून व वेळप्रसंगी दोन दिवस उपोषण करून आशुतोषदादांनी जनतेच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या कोपरगाव शहराच्या नागरिकांना उन्हाळ्यात कधी १६ दिवसांनी ते कधी २३ दिवसांनी पाणी पुरवठा होत होता

याचा प्रामुख्याने महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता.हा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु होणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी आशुतोष दादांनी अनेक आंदोलने केली. समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने पाच नंबर साठवण तलाव खोदून देवून त्यातील दगड, मुरूम,

माती समृद्धी महामार्गासाठी घेवून जावा यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून साठवण तलावाच्या कामाचा पाठपुरावा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव शहरवासियांना पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याचे वचन दिले होते.

ही वचनपूर्ती करण्यासाठी निवडून येताच आशुतोषदादांनी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या मदतीने पाच नंबर साठवण तलावाचे खोदाईचे काम सुरु करून आपल्या कामाची चुणूक दाखवली. संपूर्ण विश्वावर सध्या कोरोना विषाणूचे संकट आलेले आहे. आपल्या देशातही कोरोनाने थैमान घातले आहे.

राज्यात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. कोरोना संसर्गाची भीती न बाळगता योग्य ती काळजी घेवून आशुतोषदादा जनतेसोबत आहेत. राज्याच्या राजकारणात एक शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आशुतोष काळे यांनी अल्पावधीतच आपलं वेगळ स्थान निर्माण केलं आहे.

जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद त्यांना परमेश्वराने द्यावी यासाठी त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो व भविष्यात त्यांच्या रूपाने कोपरगावकरांना व महाराष्ट्राला एक मंत्री म्हणून लाभोत हीच सदिच्छा! संकलन – अरुण जोशी (स्वीय सहाय्यक)

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment