शहरी बाबूंमुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा विळखा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- ग्रामीण भागातून कामानिमित्त शहरात गेलेले नागरीक कोरोनाच्या भितीपोटी ग्रामीण भागातील आपल्या घराकडे वळले असल्याने ग्रामीण भागाला कोरोनाचा चांगलाच विळखा बसला आहे.

गेली चार पाच महिन्यापासून कोविड १९ या संसर्गजन्य विषाणू असलेल्या जीवावर बेतणाऱ्या जागतिक महामारीने हाहाकार माजला आहे.

चीन देशातून आलेला हा कोरोना आजार भारतात शहरांसह ग्रामीण भागात अगदी तळागाळापर्यंत हातपाय पसरताना दिसत आहे. श्रीगोंदा तालुक्यासह येळपणे गटात बहुतांशी गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे लॉकडाऊन असल्याने सर्व उद्योग व्यवसाय मोडकळीस आल्याने सर्व सामान्यांचे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्त तसेच उच्च शिक्षित ग्रामीण तरुणांनी उद्योग व्यवसायासाठी पुणे, मुंबई वा इतर मोठ्या शहराची वाट धरली.

श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडील टोकाला असणाऱ्या येळपणे गटातील बहुतांशी गावातील तरुण कुटूंबासह नोकरी वा व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले आहेत. मार्च महिन्यापासून विविध शहरांच्या अनेक ठिकाणी कोरोनाने चांगलाच धिंगाणा घातला.

ग्रामीण भागात तेंव्हा त्याचा लवलेशही नव्हता. मात्र शहरात कोरोनाच्या भितीपोटी महात्मा गांधींच्या ‘ खेडयाकडे चला ‘ घोषणेचे काटेकोरपणे पालन करताना अनेकजन ग्रामीण भागात आपल्या घराकडे परतले.

नोकरी वा व्यवसाया निमित्त शहरात गेलेले कामाच्या व्यापाने म्हणा किंवा ग्रामीण भागातील वातावरण सुट होत नसल्याचे कारण सांगून आपल्या खेडयातील घराकडे दुर्लक्ष करणारे मात्र सध्या गावीच आपल्या घरी सुट्टीची मजा घेताना दिसताहेत.

तर अनेक जन आपल्या गावाकडील घरच्यांसोबत शेतात काम करताना दिसताहेत. त्यांच्या येण्यापूर्वी ग्रामीण भागात कोरोना फक्त वृत्तपत्राद्वारे वाचला किंवा टिव्हीवर बातम्यांच्या माध्यमातून पाहिला जात होता.

मात्र कोरोनाच्या भितीने विविध शहरांतून गावाकडे परतलेल्या अनेक गावकरी पाहुण्यांच्या पाहुणचाराने कोरोना विषाणूने गावागावात शिरकाव केला असून ग्रामीण भागाला कोरोनाने चांगलाच विळखा घातला आहे.

शहरी बाबूंचे आपल्या कुटूंबियांसोबत लोंढेच लोंढे गावी आपल्या घराकडे परतले असून विशेषत: येळपणे गटाला त्यांचा चांगलाच तडाखा बसला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण कमी असले तरी गटात आज अनेक गावात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.

अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर अनेक रूग्ण बाधित असल्याने उपचार घेत आहेत. अनेकजन बाधितांच्या संपर्कात आल्याने आपापल्या घरीच होम क्वारंटाईन आहेत.

त्यामुळे आपल्याच घरच्यांच्या पाहुणचाराने आपल्यावर विनाकारण घरी बसायची वेळ आली असल्याचे घरांघरातून बोलले जात आहे. एकंदरीत शहरी बाबूंमुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा चांगलाच विळखा बसला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment