गोरगरीब भाजी-फळ विक्रेत्यांसाठी किरण काळे यांनी गाठली मनपा; आयुक्तांना धरले धारेवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- प्रोफेसर कॉलनी चौकातील कष्टकरी, गोरगरीब भाजी-फळ विक्रेते यांच्यावरती कोरोनाच्या संकट काळात अन्यायकारक कारवाई करत मागील दोन-तीन दिवसांपासून महानगरपालिकेने त्यांना या ठिकाणी बसून व्यवसाय करण्यासाठी मज्जाव केला आहे.

यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या अन्यायग्रस्त भाजी-फळ विक्रेत्यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी संपर्क साधला होता. काळे यांनी तात्काळ धाव घेत त्यांची व्यथा समजून घेतली. यावेळी भाजीविक्रेत्या महिलांना अश्रू अनावर झाले होते. काळे यांनी त्यांना धीर देत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

असे सांगत त्यांच्यासह महानगरपालिका गाठत आयुक्तांची भेट घेतली. यावेळी काळे यांच्या समवेत भाजी-फळ विक्रेते मोठ्या संख्येने महापालिकेत आले होते. आयुक्तांसमोर काळेंनी या कष्टकऱ्यांवर महापालिकेच्या वतीने सुरू असणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचला. कोरोनामुळे आर्थिक आणीबाणीची स्थीती आहे.

अर्थव्यवस्था, शहराची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडलेली आहे. त्यावर लक्ष देण्या ऐवजी महापालिकेने आपला मोर्चा गोरगरिबांकडे वळविला आहे. काळे यांनी महानगरपालिकेच्या वतीने जवळच आकाशवाणी केंद्रामागे उभारण्यात आलेल्या भाजी मंडईच्या दुरावस्थेबाबत आयुक्तांना माहिती दिली.

नगररचना विभागाने नगर शहरामध्ये योग्य पद्धतीने टाऊन प्लॅनिंग करण्याऐवजी आजवर फक्त मलई गोळा करत त्यावर ताव मारण्याच काम केलं. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी संगनमताने केवळ टक्केवारी खाण्यातच धन्यता मानली आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये गोरगरीबांना रस्त्यावर आणण्याची दुर्बुद्धी मनपाला सुचली याबद्दल किरण काळे

यांनी तीव्र नाराजी आयुक्तांसमोर व्यक्त केली. यावेळी काळे म्हणाले की, आयुक्तांनी महापालिकेच्या माध्यमातून या गोरगरीब भाजी-फळ विक्रेत्यांना बेरोजगार करण्यापूर्वी त्यांच्यासाठी योग्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि मगच कारवाई करावी. यापूर्वी देखील नेहरू मार्केट, शरण मार्केट,

दिल्ली गेटचे गाळे पाडून अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त करण्याचा पराक्रम मनपाने केला आहे. यापुढे असा हिटलरी कारभार खपवून घेतला जाणार नाही. काळे पुढे म्हणाले की, अतिक्रमणांना पाठीशी घालण्याची काँग्रेसची भूमिका नाही. परंतु आजवर शहराचे टाऊन प्लॅनिंगच मुळात योग्य पद्धतीने केले गेले नाही.

आजही केले जात नाही. योग्य प्रकारच नियोजन करण्या ऐवजी या शहरातील गोरगरीब, कष्टकरी, प्रामाणिकपणे काम करून पोट भरणाऱ्यांचा सतत छळ करण्याचे काम मनपाकडून केले जात आहे. भविष्यात असे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर सुयोग्य नियोजन करण्याची नितांत गरज या शहरामध्ये आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment