केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लाधली विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले व घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.

केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी असुन या निर्णयाचा तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनी निषेध व्यक्त करत निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा मरकड यांनी दिला आहे.

मरकड म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देण्याऐवजी अधिक अडचणीत आणले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. मार्च,एप्रिल महिन्यात काढलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारभाव कमी असल्याने कांदाचाळींमध्ये साठवून ठेवला होता.

गेली पाच , सहा महिने हा कांदा साठवून ठेवलेला असल्याने यातील ५० टक्के कांदा सडला आहे. कांद्याच्या वजनातही मोठी घट झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात केलेली संचारबंदी शिथिल करण्यात आल्याने तसेच कांद्याची निर्यात देखील सुरू झाल्याने कांद्याची मागणी वाढल्याने सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होऊ लागली होती.

सहा, सात रुपये दराने विकला जाणारा कांदा तीस रुपयांपर्यंत गेल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु कांद्याचे दर चढताहेत हे लक्षात येताच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय मागे घेऊन कांदा निर्यात सुरू करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा तालुकाध्यक्ष मरकड, युवा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विवेक मोरे, तालुका कार्याध्यक्ष अंबादास डमाळे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment