कोरोनाची लस घ्यायची की नाही इच्छेवर अवलंबून,पण … वाचा काय म्हणाले आरोग्य मंत्रालय..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- कोरोनाची लस घ्यायची की नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून राहील. मात्र, लसीचे सर्व डोस घ्यावेत असाच आमचा सल्ला असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरात कोविड-१९ च्या सहा लसींच्या चाचण्या सुरू आहेत. मंत्रालयाने लसींबाबतच्या जिज्ञासांवर जारी एफएक्यूत म्हटले आहे की, भारतात उपलब्ध लसही इतर देशांत विकसित लसींएवढीच प्रभावी असेल. याआधी कोविड-१९ चा संसर्ग झालेल्या लोकांनाही लसीचा संपूर्ण डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

कारण, त्यामुळे या रोगाविरुद्ध भक्कम प्रतिबंधक क्षमता तयार होईल. २८ दिवसांच्या फरकाने लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांत शरीरात अँटिबाॅडीजचा सुरक्षात्मक स्तर तयार होतो.

कमी काळात चाचणीनंतर तयार झालेली लस सुरक्षित असेल का आणि तिचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का, या प्रश्नांवर मंत्रालयाने म्हटले आहे की, सुरक्षा आणि प्रभावी असेल याच आधारावर नियामक संस्थांकडून मंजुरी मिळाल्यानंतर लस देण्यास सुरुवात होईल.

सुरक्षित लसीकरण मोहिमेच्या दृष्टीने विपरीत परिणामाच्या स्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे राज्यांना सांगण्यात आले आहे.

Leave a Comment