शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण – आ. विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शिर्डी मतदारसंघातील सुमारे १ लाख ४७ हजार नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत अपघात विमा योजना सहा वर्षाची झाली.

अखंडीतपणे सुरू असलेल्या या योजनेचा आजपर्यंत १७० कुटूंबियांना 3 कोटी रूपयांचा लाभ मिळाला असून, या योजनेच्या माध्यमातून नागरीकांना सामाजिक सुरक्षा देणारा शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण ठरले आहे.

अशी माहिती आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखली आणि खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून २०१५ साली शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली.

जनसेवा फौंडेशन, प्रवरा सहकारी बँक आणि विमा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ही योजना प्रयोगिक तत्वावर सुरू झाली. यासाठी मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या विम्याची रक्कम जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून भरण्यात आली.

याबाबत आवश्यक असलेली अतिशय मोजकी कागदपत्रही नागरीकांडून जमा करून या योजनेत नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग नोंदविण्यात आला. अपघातामध्ये मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या वारसदारास दोन लाख रूपये आणि अपंगत्व आल्यास दिड लाख रूपयांच्या मदतीचा अंतर्भाव या योजनेत आहे.

तब्बल सहा वर्षे ही योजना अव्याहतपणे सुरू असून आतापर्यंत १७० कुटूंबियांना या योजनेच्या माध्यमातून सुमारे ३ कोटी ३३ लाख रूपये मिळवून देण्यात आले असल्याचे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मतदारसंघातील नागरिकांसाठी सुरु केलेली योजना सहा वर्षापासून यशस्वीपणे सुरू आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षेचे कवच मिळवून देणारा शिर्डी मतदारसंघ हा देशातील एकमेव आहे असे सांगतानाच, ज्या कुटूंबियांतील व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाला किंवा एखाद्या व्यक्तिस अवयव गमवावा लागला अशा नागरिकांसाठी या योजनारुपी मदतीचे सहकार्य करता आल्याचे समाधान आ.विखे पाटील यांनी बोलून दाखविले.

एखाद्या कुटूंबात घडलेल्या दुर्घटनेनंतर केवळ सांत्वनपर भेट देवून आपण दु:ख व्यक्त करतो. परंतू या योजनेच्या माध्यमातून या कुटूंबाला दिलासा देता येत असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. यामुळे इतर विकास कामांबरोबरच नागरीकांच्या सामाजिक सुरक्षिततेचे काम अधोरेखित होत असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment