प्रजासत्ताकदिनी शहरातून निघणार ट्रॅक्टर तिरंगा रॅली गावा-गावात देखील रॅलीचे आयोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-  दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी अहमदनगरमधे ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढून दिल्ली किसान आंदोलनात सहभाग नोंदविण्याचा निर्णय अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आला.

शनिवारी (दि.23 जानेवारी) हमाल पंचायत येथे झालेल्या बैठकित ट्रॅक्टर तिरंगा रॅलीच्या तयारीचा आढावा घेऊन रॅलीचे नियोजन करण्यात आले. तर जिल्ह्यातील गावा-गावात ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढून व शेतकरी स्वत:च्या ट्रॅक्टरवर तिरंगा ध्वज लाऊन या आंदोलनात सहभाग घेणार आहे.

हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकिस संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाचे अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, आर्किटेक अर्शद शेख, संध्या मेढे, रामदास वागस्कर, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, रविंद्र फुलसौंदर आदी उपस्थित होते.

दिल्ली येथे भारतभरातील शेतकरी संघटना आपल्या न्याय्य हक्कासाठी 26 नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे, वीज बिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी संहिता रद्द होण्यासाठी ट्रॅक्टर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर रॅलीचे मंगळवार दि.26 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होऊन, पत्रकार चौकातील शहिद भगतसिंग स्मारक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या बैठकित सदर रॅलीसंदर्भात नियोजन करण्यात आले असून, या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याची माहिती अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी माहिती दिली.

दिल्ली येथील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारबरोबर अकरा फेर्‍यांमध्ये चर्चा केली. मात्र केंद्र सरकारच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे हा प्रश्‍न सुटण्यास तयार नसल्याने दिल्लीसह देशाच्या विविध ठिकाणी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात 147 आंदोलक शेतकर्‍यांचे बलिदान गेले आहे.

त्यामुळे देशातील शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, भाजप वगळून सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांनी या आंदोलनास सक्रीय पाठिंबा दिलेला आहे. या रॅलीत सहभागी होऊन दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment