सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी पतसंस्था चळवळीचे योगदान महत्त्वाचे राहिले -आमदार संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी पतसंस्था चळवळीचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. सर्वच पतसंस्थांचा कारभार चुकीच्या पध्दतीचा नसून, अनेक पतसंस्थांनी उत्तम पध्दतीने कार्य करुन आपले नांव उज्वल करुन एक विश्‍वास निर्माण केला आहे.

गरजेच्या वेळी पतसंस्था आधार देण्याचे काम करतात. मात्र कर्जाची परतफेड करताना ती कर्जदारांनी प्रमाणिकपणे करण्याची गरज आहे. संस्था टिकवण्यासाठी नियम व धोरणानुसार कार्य आवश्यक आहे. महिला बचत गट, होतकरु व गरजू युवकांना व्यवसायासाठी आर्थिक आधार देण्याचे कार्य श्रीनिवास नागरी सहकारी पतसंस्था करणार असल्याची अपेक्षा आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

पाईपलाइन रोड, एकवीरा चौक येथील श्रीनिवास नागरी सहकारी पतसंस्था व एस.एस. फायनान्शियल कन्सल्टंटच्या शुभारंभाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे, पंडीत दिनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, नगरसेवक सुनिल त्रिंबके, विनीत पाऊलबुध्दे, नितीन बारस्कर, निखील वारे, बाळासाहेब पवार,

अमोल गाडे, विठ्ठलराव वाडगे, शिवाजीराव कपाळे, दत्तात्रय गावडे, सुनिलजी सौंदरमल, प्रशांतजी भालेराव, सोमनाथजी वाडेकर, आप्पासाहेब गागरे, अनिल निकम, सुधांशू शर्मा, अ‍ॅड. बाळासाहेब खांडरे, अण्णासाहेब म्हस्के, संजयजी काठेड, मुख्यध्यापक सुसरे, हरीभाऊ डोळसे, कुलदीप भिंगारदिवे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत पतसंस्थेचे चेअरमन शाम साळवे, व्हाईस चेअरमन सागर सारोळकर, संचालक सोमनाथ वराडे, विशाल रायपेल्ली यांनी केले.

बुलढाणा येथील बिबी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाम साळवे व सोमनाथ वराडे यांनी महिलांना स्वयंरोजगार निर्माण करुन देण्यासाठी कर्जरुपाने भांडवल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. युवक व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामाजिक भावनेने कार्य केले जाणार असल्याचे सांगून, पतसंस्था व फायनान्शियल कन्सल्टंटची त्यांनी माहिती दिली.

काका कोयटे म्हणाले की, कोरोनानंतर सर्वसामान्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी चार युवकांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या पतसंस्था उभारणीचे कार्य प्रेरणादायी आहे. जिल्ह्याला सहकार क्षेत्राचा मोठा वारसा असून, पतसंस्था चळवळ नावरुपास आली. काहींच्या चुकीमुळे सर्व पतसंस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पतसंस्था चळवळ वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधी व राजकारणींच्या सहकार्याची गरज आहे.

मोठ्या बँका भांडवलदारांसाठी उभ्या राहिल्या असून, पतसंस्था या सर्वसामान्य व्यावसायिक व गोरगरीबांना मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. मागील भाजप सरकारच्या काळात पतसंस्थेवर जाचक निर्णय लादण्यात आले. तसेच अनेक प्रश्‍नांकडे सरकारने दुर्लक्ष केले. पतसंस्था चळवळ वाचविण्यासाठी जाचक नियम रद्द करुन व प्रलंबीत मागण्या पुर्ण होण्यासाठी दि.10 एप्रिलपासून मुंबईच्या आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आनंद लहामगे यांनी पतसंस्था चळवळीने सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले. नागरिकांनी देखील त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखील वारे यांनी केले. आभार बाळासाहेब पवार यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment