नोटाबंदी व जीएसटीनंतर महागाईच्या भडक्यात जनता होरपळत आहे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-बहुजन समाज पार्टी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहे. सत्ताधारी भाजपने फक्त नागरिकांना आश्‍वासन देऊन दिवसा स्वप्न दाखविले.

सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सुटण्यास अवघड झाले असताना, नोटाबंदी व जीएसटीनंतर महागाईच्या भडक्यात जनता होरपळून निघत आहे.

सत्ताधारी महागाई रोखण्यात अपयशी ठरत असताना सर्वसामान्यांना जगणे देखील अवघड झाले असल्याची भावना बसपाचे राष्ट्रीय महासचिव खासदार वीरसिंग यांनी व्यक्त केली.

बहुजन समाज पार्टीच्या मुंबई, चेंबूर येथील कार्यालयात अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी खासदार वीरसिंग बोलत होते.

यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेश सचिव सुदिप गायकवाड, एस.एस. तायडे, वाघमारे, अहमदनगर जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे आदी उपस्थित होते.

या बैठकित खासदार वीरसिंग यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभेत पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकार्‍यांना सूचना केल्या.

जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या पक्षाच्या कार्याची माहिती देऊन, गाव तेथे बुथ स्थापन करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

अहमदनगर बसपाच्या वतीने राष्ट्रीय महासचिव खासदार वीरसिंग व प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने यांचा सत्कार करण्यात आला.