मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांच्या ‘या’ गोष्टीला सरकारचे प्राधान्य राहील!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून, महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.

सर्व देश, राज्य टाळेबंदीत (लॉकडाऊन) होते तरी शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे घरुनच (वर्क फ्रॉम होम) केली जात होती. शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती.

इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत, यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कटुंबियांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्री म्हणाले, जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात आणि शेतकऱ्यांचे मात्र रात्रीचे कशासाठी.

ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संकटांचा मुकाबला करत तो जगासाठी सोनं पिकवत असतो. त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे क्षण कसे येतील हे पाहणे सरकारचे काम आहे. ‘घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ’ असे आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाची ताकद मोठी असते.

ती जेवढी जास्त मिळेल तेवढा काम करण्याचा हुरुप वाढतो. त्या जोरावर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे जे करणे शक्य आहे ते निश्चितच करू. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे यास आमचे प्राधान्य असून नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या दृकश्राव्य बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबील थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरण अंतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.

तसेच शेतकरी, घरगुती वीज ग्राहक आदी सर्वांनाच व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी वीजबिले भरणे आवश्यक आहे. वीजगळती होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर