बिहार राज्याला लाजवेल अशा प्रकारची ही घटना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा तपास करून आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार दातीर यांचे ६ एप्रिल रोजी राहुरी येथील मल्हारवाडी रोड वरुन अपहरण करण्यात आले व त्यांची हत्या करण्यात येऊन त्यांचा मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात आणून टाकण्यात आला.

मृत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते या बाबत दातीर यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे राहुरी तालुक्यात गुंडांचा वावर वाढला आहे.

राहुरी तालुक्याच्या इतिहासात बिहार राज्याला लाजवेल अशा प्रकारची ही घटना आहे. गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची सामान्य नागरिकांवर दहक्षत निर्माण झाली आहे.

पोलिसांचा व कायदयाचा धाक राहिलेला दिसत नाही मयत पत्रकार दातीर यांनी राहुरी शहरातील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या १८ एकर क्षेत्राच्या खरेदी विक्री व ताब्या बाबत वेळोवेळी उपोषण तक्रार अर्ज बातम्या आदिच्या माध्यमातुन पाठपुरावा केलेला होता.

या गुन्हयातील संशयित आरोपी कान्हू गंगाराम मोरे या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मोठे राजकीय पाठबळ असल्याची शक्यता असून यापूर्वी संशयित आरोपी कान्हू मोरे याच्यावर ३०२ सारखे गंभीर गुन्हयांची नोंद आहे.

संबधित खुनाचा कट कसा शिजला याबाबत संशयित आरोपीच्या मोबाईलचे सीडीआर तपासले जावेत तसेच मोबाईलचे लोकेशन तपासावे. या गुन्ह्यातील सहभागी असलेल्या सर्वाचा मुळाशी जाऊन तपास करावा.

सर्व आरोपीना अटक करावी व त्यांना कठोर शासन व्हावे अन्यथा आदोलन करण्यात येईल. मृत दातीर यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे.यासंदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|