अरे देवा! ‘या’ तालुक्यातील ४३ गावांमध्ये परत लॉकडाऊन…?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पारनेर तालुक्यातील कोरोना प्रभावीत ४३ गावांमध्ये ३१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पारनेर तालुक्यातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे नगर जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढला असून तालुक्यातील कोरोना निर्मूलन करण्यासाठी ४३ गावे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

आमदार निलेश लंके यांच्यासह पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.

जास्त कोरोना रूग्ण संख्या  असलेली तालुक्यातील गावे पूर्णपणे लॉकडाऊन केल्याने कोरोनास अटकाव  होणार आहे व हा पारनेर तालुक्याचा  पारनेर पॅटर्न राबवुन कोरोनाचे निर्मूलन करणार असल्याचेही ते म्हणाले.

अनेक गावात नियमांचे दुकानदारांकडून  उल्लंघन होत असून नियम मोडणाऱ्या व्यवसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे.

तालुक्यातील  अनेक गावात कोरोना चाचणी करण्यासाठी ग्रामस्थ नकार देत असून चाचण्यांची संख्या वाढवणार असल्याचे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.