धक्कादायक ! शेतकऱ्याच्या शेतातून वाहतंय गटारीचे पाणी ; पिके सापडली धोक्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- बळीराजासाठी त्याची शेतीच सर्वकाही असते. शेतीला जगवण्यासाठी बळीराजा अपार कष्ट करतो व शेती फुलवतो. मात्र याच शेतकऱ्याच्या शेतात पाण्याऐवजी चक्क गटार वाहू लागली आहे.

यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. नगर शहरातील बोल्हेगावच्या गांधीनगर परिसरात बंद पाईप गटार योजना नसल्यामुळे गटारीचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतातून वाहत असल्याने उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.

बोल्हेगाव रोड ते खारवड्यापर्यत बाराशे व्यासाची बंद पाईप गटार योजनेचे काम 15 दिवसाच्या आत सुरू करावे, अन्यथा महानगरपालिकेत शेतकर्‍यांच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक कुमार वाकळे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.

बोल्हेगाव मधील शेतकर्‍यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे या शेतकर्‍यांची उपजिविका शेतीवरच अवलंबून आहे. परंतु या गटारीच्या दूषित पाण्यामुळे पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याच बरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

तरी महापालिकेने लवकरात-लवकर लक्ष घालून बंद पाईप गटार योजनेचे काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रमेश वाकळे, मोहन वाकळे, भास्कर वाकळे, कचरू वाकळे,

भीमा वाकळे, भाऊसाहेब वाकळे, बाळासाहेब वाकळे, किसन कोलते, संतोष वाटमोडे, ज्ञानदेव कापडे, राजू बंग, सावळेराम कापडे, सुरेश वाटमोडे आदी शेतकरी उपस्थित होते.