अहमदनगर ब्रेकिंग : साखरपुडा ठरलेल्या तरुणाच्या बाबतीत घडले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :- विहिरीचे खोदकाम सुरू असताना विजेचा शॉक लागून कणगर ता. राहुरी येथील आरबाज शेख (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे घडली आहे.

भोकर परीसरातील वडजाई शिवारात रविंद्र गोविंद काळे यांचे गट नं.140 मध्ये पन्नास फूट विहीर खोदाईचे काम सुरू होते. हे काम राहुरी तालुक्यातील निसार शेख यांनी घेतले आहे.

दुसर्‍या पिढीपासून शेख कुटुंबिय विहीर खोदाईचे काम करतात. कधी मनुष्यबळ तर कधी पोकलेनच्या साहाय्याने विहिरीचे खोदकाम सुरू होते.

सकाळी ब्लास्टींग करून पोकलेनच्या साहाय्याने त्यातील मटेरीयल काढण्याची तयारी सुरू असताना विहिरीतील पाणी काढण्यासाठी असलेल्या वीज मोटारच्या वायरचा वीजपुरवठा पोकलेनच्या बकेटमध्ये व त्यातून विहिरीत उतरला.

जवळच असलेला निसारभाई शेख यांचा धाकटा मुलगा आरबाज निसार शेख (वय 22) याला विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याचा मोठा भाऊ शाहबाज याचेसह चौघेजण विहिरीतच होते.

परंतु उर्वरीत चौघे केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले. हा प्रकार लक्षात येताच आरबाज याला रुग्णालयात हलविले, प्रथम खाजगी व नंतर साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.नि. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. शरद गायमुखे करीत आहेत.

आरबाज याची सोयरीक जमली होती, पुढील महिन्यात साखरपुडा व विवाहाची तयारी सुरू होती. या दुर्घटनेने शेख कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे