नगरकरांसाठी खुशखबर! अमृत पाणी योजनेचे काम मे अखेर पूर्ण होणार!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : केंद्र सरकारच्यावतीने नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या ‘मे’ महिन्याअखेर ही सर्व कामे पूर्ण होऊन दररोज नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जाईल.

अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. विळद पंपिंग हाऊस येथे अमृत पाणी योजनेचे पंप व मोटार बसवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमहापौरगणेश भोसले, मनपा सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, जलअभियंता परिपल निकम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, सन १९७२ साली मुळा धरणातून नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे काम पूर्ण झाले. आता अमृत पाणी योजनेच्या माध्यमातून दुसर्‍या पाणी योजनेचे पूर्ण होणार आहे. नगर शहर विकासकामातून महानगराकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शहराच्या उपनगरांमध्ये वेगाने नागरी वसाहती वाढत आहेत.

टप्प्याटप्प्याने विकासाचे प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावली जात आहेत. नगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मुळा धरण पंपिंग हाऊस ते विळद पंर्पिग हाऊस यादरम्यान ११०० एमएम व्यासाची पाईपलाईन टाकून झाली आहे.

याचबरोबर विळद पंपिंग हाऊस ते वसंत टेकडी पर्यंत ११०० एमएम व्यासाची नवीन पाईपलाईन टाकून झाली आहे. वसंत टेकडी येथे ५० लाख लिटर क्षमतेची टाकीचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर विळद जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन ४५ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे.

विळद येथे ६०० एचपीचे तीन पंप बसवण्यात आले आहे. याचबरोबर ६०० एचपीचे तीन मोटर बसवण्याचे काम सुरू आहे. इतर सर्व कामे मे महिना अखेर पूर्ण होईल व नगर शहराला नियोजनबद्ध दररोज पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी उपाययोजना केल्या जाईल.

नगर शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था याचबरोबर फेज टू पाण्याच्या टाक्‍या व पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जाईल असे ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम यांनी योजनेची माहिती दिली.