Sugarcane Farming : शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ! उसाच्या पिकात लबाड सोयाबीनचं आंतरपीक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंखेडा येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने उसाच्या पिकात लबाड सोयाबीन आंतरपीक म्हणून घेण्याचा प्रयोग केला आहे.

पंकज रावल असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी खरीप हंगामात आपल्या सहा एकर शेत जमिनीवर सोयाबीनची पेरणी केली. सारंखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई भासत असते. यामुळे त्यांनी सोयाबीन काढणी ही हार्वेस्टरच्या माध्यमातून केली.

साहजिकच हार्वेस्टरच्या माध्यमातून सोयाबीन काढणी झाली म्हणजे सोयाबीनचे दाणे मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडतात. यामुळे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नुकसान होते.

परंतु पंकज यांनी हे नुकसान टाळण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला. सोयाबीन काढणी झाल्यानंतर ऊस लागवड केली. लागवडीनंतर उसाला पाणी देण्यात आले यामुळे वावरात पडलेले सोयाबीन देखील अंकुरले पंकज यांनी हे अंकुरलेले सोयाबीन काढून टाकण्याऐवजी त्याच्यापासून देखील उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.

म्हणजेच उसाच्या पिकात लबाड सोयाबीन आंतरपीक म्हणून घेण्यात आले. विशेष म्हणजे हा प्रयोग त्यांनी पहिल्यांदा केला नसून गेल्यावर्षी देखील लबाड सोयाबीनची यशस्वी आंतरपीक शेती त्यांनी केली होती. पंकज यांच्या मते या पद्धतीने शेती केल्यामुळे एकाच पाण्यात सोयाबीन आणि उसाचे उत्पादन निघते.

तसेच, यामुळे सोयाबीन पिकातून निघणारा पालापाचोळा ऊस पिकासाठी खताचे काम करते. तसेच नत्राचा उत्तम स्रोत असलेले सोयाबीन पिकांमुळे उसाच्या उत्पादनात वाढ होते. म्हणजेच रावल यांना या प्रयोगामुळे तिहेरी फायदा मिळत आहे. गेल्या वर्षी या पद्धतीने शेती केली असल्याने त्यांना याचा चांगला अनुभव देखील आला आहे.

याच अनुभवाच्या जोरावर यंदा देखील त्यांनी उसाच्या पिकात लबाड सोयाबीन आंतरपीक म्हणून घेतलं असून यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळणार आहे. निश्चितच अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत रावलं यांच्यासारखा प्रयोग शेतीमध्ये केला तर कमी संसाधनात आणि कमी खर्चात अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या प्रयोगामुळे मिळणार अधिक उत्पादन 

अशा पद्धतीने आंतरपीक घेतले असल्याने रावल यांना सोयाबीन बियाणासाठी अधिकचा खर्च करावा लागला नाही. जे बियाणं किंवा सोयाबीन वाया जाणार होतं त्यातूनच त्यांना उत्पादन मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांना अधिक श्रम करण्याचे देखील गरज नाही. उसाच्या पिकात जी अंतरमशागतीची कामे केली जातात किंवा पाणी भरलं जातं त्यातूनच सो

याबीन पिकाची वाढ होते. यासाठी इतर खतांची देखील गरज भासत नाही. याउलट सोयाबीन पिकामुळे उसाच्या पिकाला नत्राचा पुरेपूर पुरवठा होतो, म्हणजे यामुळे उसाच्या पिकात देखील खतांची मात्रा कमी द्यावी लागते. एकंदरीत जर विचार केला तर या लबाड सोयाबीनच्या आंतरपिकाचा हा प्रयोग रावल यांना तिहेरी फायदा देणारा ठरला आहे.

यामुळे सध्या या प्रयोगाची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनी योग्य नियोजन आखून शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली तर शेती हा तोट्याचा नव्हे तर फायद्याचा व्यवसाय बनू शकतो, हेच रावल यांच्या प्रयोगातून अधोरेखित झाले आहे.