कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-जिल्ह्याच्या काही भागात विशेषता ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात.

ग्रामसुरक्षा दल आणि हिवरे पॅटर्न प्रमाणे गावात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी आता अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अशा गावांना थेट भेटी देऊन पाहणी करावी,

असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे,

डॉ. बांगर, डॉ. भागवत दहिफळे हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, विशेषता सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

अद्याप ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत., ही बाब गांभीर्यांने घेणे आवश्यक आहे. गावात बाहेरगावाहून आलेल्या आणि आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तपासणी होणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने गावात कार्यरत विविध पथकांनी आता सक्रीय भूमिका बजावणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त गाव ठेवायचे असेल तर नियमांचे पालन करावे लागणार असल्याची बाब तालुकास्तरीय अधिकाऱी आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पटवून द्यावी,

असे डॉ. भोसले यांनी सांगितले. जिल्ह्यात आता लसीकरण मोहिम १८ ते ४४ वयोगट तसेच ४५ व त्यापुढील नागरिकांसाठी सुरु आहे.

त्या-त्या ग्रामीण रुग्णालय अथवा लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. तेथील आरोग्य यंत्रणेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, जेणेकरुन अशा केंद्रावर गर्दी होणार नाही.