आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- “ऊस तुटल्यावर १४ दिवसात ६० टक्के एफआरपी त्यानंतर पुढच्या १४ दिवसात २० टक्के एफआरपी आणि त्यानंतर दोन महिन्यात २० टक्के एफआरपी द्यावी.

तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी १९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तीस्थळांची’ या आंदोलनाची घोषणा केली आहे.

‘ऊसाच्या एफआरपीसाठी घटस्थापनेपासून जोतिबाचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली जाईल. जोतिबा, अंबाबाई, बाळू मामा यांचं दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात होणार.

१९ ऑक्टोबर रोजी २० वी ऊस परिषद होणार असून कुणाची परवानगी मागणार नाही,’ असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान “शेतकऱ्यांना चार पैसे देण्याचं साखर कारखानदार यांच्या मनात नाही.

त्यामुळे निती आयोगाला हाताला धरून एफआरपीचे तुकडे पाडण्याचे काम सुरू केले आहे. एफआरपीचे तुकडे करण्याचं काम भाजपनं केलं आणि तेच पुण्यात आंदोलन करत आहेत,” अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.