महसुलात मोठी भर; जिल्हा परिषदेची ३०८ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्हा परिषदेकडून गेल्या १० वर्षांत ग्रामीण भागातील सुमारे साडेआठ लाख कुटुंबांकडून ३०८ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल केली आहे.

वसुलीचे हे प्रमाण साधारण ८५ टक्के आहे. दरम्यान जिल्हा परिषदेकडून दरवर्षी जिल्ह्यातून सरासरी ३० ते ३५ कोटी रुपये घरपट्टीपोटी वसूल केले जातात.

ग्रामपंचायतमार्फत प्रत्येक गावातून घरपट्टीपोटी कर गोळा केला जातो. आर्थिक वर्षाच्या अखेर हा कर गोळा करून जिल्हा परिषदेकडे भरला जातो. ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींमध्ये ५०० ते १५०० रुपयांपर्यंत घरपट्टी प्रति एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना वसूल केली जाते.

यात व्यापारी कारणास्तव दिलेल्या किंवा भाड्याने दिलेल्या घरांसाठी व्यावसायिक दराने घरपट्टीची वसुली करण्याची तरतूद आहे.

या अकरा वर्षांपैकी सन २०१०-११ व २०१४-१५ या दोन वर्षांमध्ये घरपट्टीची वसुली विक्रमी ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली होती. तर २०१५-१६ व २०१७-१८मध्ये वसुलीचे प्रमाण कमी होऊन ते अनुक्रमे ७६ व ७८ टक्के झाले.

अकरा वर्षांत वसुलीपात्र ३६१ कोटींपैकी ३०८ कोटींची वसुली …. :- नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (महापालिका, नगरपालिका वगळून) लोकसंख्या ४२ लाख असून कुटुंबांची संख्या ८ लाख ३८ हजार आहे. त्यांच्याकडून मागील २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४७ कोटी रुपये घरपट्टीची रक्कम वसुलीस पात्र होती.

त्यापैकी ३८ कोटी १२ लाख रुपयांची (८१ टक्के) वसुली झाली. दरम्यान, २०१०-११ ते २०२०-२१ या अकरा वर्षांत वसुलीपात्र ३६१ कोटींपैकी ३०८ कोटींची वसुली झाली. वसुलीचे हे प्रमाण ८५.३४ टक्के आहे.