पन्नास हजारांहून अधिक वाहनांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे.

अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मुंबई) चे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर, २०२२ रोजी नागपूर येथे झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दवेंद्र फडवणीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्ग वाहतुकीस सर्वांना खुला करण्यात आला.

नागपूर ते शिर्डी या ५२० कि.मी. च्या टप्प्यात शुक्रवारपर्यंत ५० हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारक व चालकांची कुठेही गैरसोय होऊ नये, याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुरेपुर काळजी घेतलेली आहे.

इंधनस्थळ – समृद्धी महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी व शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने ६ ठिकाणी अशा एकूण १३ ठिकाणी इंधनाची सोय करण्यात आलेली आहे.

नागपूर ते शिर्डी
जिल्हा        गाव             सा.क्र.
नागपूर।       वायफळ    11 + 200
अमरावती     शिवनी      136 +400
बुलढाणा    डोणगाव     268 + 200
बुलढाणा      मांडवा      310 + 600
जालना       कडवंची    353 + 800
औरंगाबाद     पोखरी    419 + 000
औरंगाबाद    अनंतपूर    461 +700

शिर्डी – नागपूर

जिल्हा            गाव             सा.क्र.
औरंगाबाद    डवाळा    497 + 600
बुलढाणा      मांडवा     311 + 000
बुलढाणा    डोणगाव   268 +900
अमरावती     शिवनी    136 + 700
नागपूर      रेणकापूर    80 + 400
नागपूर        वायफळ    10 + 300

स्नॅक्स

या इंधन स्थानकावर स्नॅक्स, पिण्याचे पाणी तसेच टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. तसेच वाहनाच्या किरकोळ दुरुस्तीची सुविधा इंधन स्थानकाजवळ पुरवण्यात आली आहे. याशिवाय १६ ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा (Way side Amenities) सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच प्रवाशांना ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.

प्रसाधनगृह या १३ इंधन स्थानकांवर प्रसाधनगृहाची सुविधा आहे. तसेच पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा आहे. अपघाताच्या वेळेस अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी खालील प्रकारे सुविधा देण्यात आलेली आहे.

 

शीघ्र प्रतिसाद वाहने (QRV) एकूण २१ वाहने – द्रुतगती मार्गावर इंटरचेंजवर २१ सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने तैनात आहेत. घटना घडल्यानंतर तातडीने अपघातस्थळी ही वाहने पोहचतील. या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी व घटना नियंत्रण करणेसाठी फायर फायटिंग सिस्टिम, कटर्स, ऑक्स‍िजन सिलिंडर्स, हायड्रॉलिक जॅक, प्रथमोपचार सुविधा व उपकरणे इ. अत्याधुनिक सुविधा ठेवण्यात आलेल्या आहेत.

क्रेन- अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला घेण्यासाठी ३० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन २४ तास तैनात आहे. अपघाताची सूचना मिळताच क्रेन तातडीने घटनास्थळी पोहचेल. क्रेनची एकूण संख्या १३ आहे.

गस्त वाहने- प्रवाशांच्या मदतीसाठी एकूण १३ गस्त वाहने कार्यरत आहेत. अपघातानंतर वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टीने द्रुतगती मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना गस्त वाहनांमधील कर्मचारी करतील.

सुरक्षा रक्षक- द्रुतगती मार्गावर सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस (Highway Safety Police) तैनात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत.

रुग्णवाहिका – अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण १५ रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता १०८ क्रमांकावर संपर्क करावा.

हेल्पलाईन क्रमांक – वाहनाचा बिघाड / अपघात झाल्यास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2233/ 8181818155 वर त्वरीत संपर्क करावा. सदर हेल्पलाईन क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.

नियंत्रण कक्ष व मुख्य नियंत्रण कक्ष नागपूर ते शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्गावर प्रत्येक इंटरचेजच्या ठिकाणी स्वंतत्र नियंत्रण प्रणाली असून ते मुख्य नियंत्रण कक्षाशी संलग्न आहेत. औरंगाबादमधील सांवगी इंटरचेंज येथे मुख्य नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला असून सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जात आहे.

सुरक्षित प्रवासासाठी, नियमांचे पालन गरजेचे अपघात होऊ नये व सुरक्षित प्रवास होण्याच्या दृष्टीने प्रवाशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ. सुस्थितीत असण्याची खात्री करणे.

द्रृतगती मार्गावर वाहनाची गती विहित मर्यादित ठेवणे, जेणेकरुन सुरक्षित प्रवास होईल. लेनची शिस्त पाळणे, चूकीच्या बाजूने ओव्हरटेक करु नये, मुख्य मार्गिकेवर वाहने पार्क करु नये, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, सीट बेल्ट वापरणे इ. बाबीचे काळजीपूर्वक पालन करणे गरजेचे आहे.असे ही श्री. अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.