यंदाच्या वर्षी उशिरा पोहचणार विद्यार्थ्यांच्या हाती पाठयपुस्तके

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे.

अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने अनेक गोष्टी या पुढे ढकलत गेल्या आहेत. दरम्यान दरवर्षी सरकारी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पाठ्यपुस्तके पडतात.

मात्र, यंदा करोनाच्या स्थितीमुळे मोफत पाठ्य पुस्तकांना उशीर झाला असून पुढील महिन्यांत पाठ्य पुरस्तके उपलब्ध होणार आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेसह सर्व अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.

शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वाटप होते. मागील वर्षी करोनामुळे जूनअखेर ही पुस्तके वाटप करण्यात आली होती. यंदाही शाळा सुरू झाल्या नसल्या तरी मुलांना पुस्तकांचे वाटप होणार आहे.

करोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांकडे पुस्तके सुस्थितीत असतील तसेच शासनाची आर्थिक स्थिती लक्षात घेता पुस्तकांचा पुनर्वापर व्हावा, या हेतूने मागील वर्षीची पुस्तके गोळा करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते.

शिक्षकांनी सुटीमध्ये ही पुस्तके गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 22 हजार 173 पुस्तकांचे संच जमा होऊ शकली. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांसाठी अडीच लाखांच्या जवळपास पुस्तकांच्या संचाची मागणी करण्यात आली आहे.

जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात पाठ्य पुस्तकांचे संच उपलब्ध होणाची शक्यता शिक्षण विभागाकडून वर्तविण्यात आली जिल्हा परिषदेकडून शासनाकडे 23 लाख पुस्तकांची मागणी नोंदवली आहे.

सध्या पुस्तके नसली तरी शिक्षकांकडून ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिला जात आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत 4 लाख 66 हजार विद्यार्थी असून त्यांना 2 लाख 96 हजार संच आणि 24 लाख 20 हजार पाठ्यपुस्तकांची गरज आहे.