जिल्हाधिकारी म्हणाले…कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्हावासियांनी नियमांचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील करोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू, तसेच, करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या-त्या भागासाठी आस्थापना बंदच्या वेळासंदर्भात घेतलेल्या

निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. करोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे आढावा घेतला.

त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा… आदींसह इतरजण उपस्थित होते.

जिल्ह्यात निर्बंध शिथील झाल्याने काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीणभागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत. त्यामुळे करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथील व्यापारी, उद्योजक आस्थापनांच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्या-त्या शहरांसाठी दुकाने सुरु आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत.

त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे.

त्यामुळे संबंधित आस्थापनांच्या चालकांनीही त्यांच्या दुकानात येणारे ग्राहक अथवा दुकानात काम करणारे कामगार कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत असल्याबाबत खात्री करावी. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.