राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी सुमारे 6 हजार 100 पदे भरली जाणार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राज्यातील तरुणांसाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत.

अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणा-या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पदभरती संदर्भातील निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता रिक्त असलेली शिक्षण सेवक पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही भरती राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित तसंच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील आणि शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर होणार आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असं वित्त विभागाचे शासन निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती.

शिक्षकांची पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, यांनी पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया पदभरती बंदीतून वगळण्यात

यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शिक्षण सेवक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.