बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान भरपाई दिली, पीकविमा की भीकविमा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे. या हंगामातही पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे.

जळगाव जिल्ह्यातही खरीप हंगामात हजारो शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल आणि झालेलं नुकसान तरी भरून निघेल म्हणून पिक विमा उतरवला. यासाठी हजारो रुपयांचे प्रीमियम भरलं.

शेतकऱ्यांना जी भीती होती तसंच झालं देखील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. शासनाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून घेण्यात आले. आता पंचनामे झाले सर्वेक्षण झाले यानंतर समाधानकारक नुकसान भरपाई मिळेल आणि आपलं पिकांचे नुकसान भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

मात्र पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अतिशय तोकडी अशी नुकसान भरपाई देत बळीराजाची क्रूर चेष्टा जिल्ह्यात वाजवण्यात आले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना हजारो रुपयांचे नुकसान झालेले असतानाही 100 ते 200 रुपयांचे नुकसान भरपाई पिक विमा कंपन्यांकडून वर्ग करण्यात आली. यामुळे पिक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिली आहे की भीक दिले आहे असा असेल तर सवाल शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांनी हा पिक विमा नसून भिक विमा आहे असा घणाघात देखील यावेळी केला.

जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे 38 हजाराचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले मात्र या शेतकऱ्याला पिक विमा कंपन्यांकडून केवळ 68 रुपये देण्यात आले. सध्या खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांसाठी नुकसान भरपाई चा दुसरा हप्ता देण्याचे काम सुरू आहे. मात्र हा दुसरा हप्ता देताना देखील शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी केली जात आहे. यामुळे पिक विमा कंपन्यांविरोधात तसेच शासनाविरोधात रोष शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

पंचनाम्याची प्रत शेतकऱ्यांना मिळाली नाही

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर संबंधितांकडून पंचनामे करण्यात आले. पंचनामे झाल्यानंतर त्या पंचनाम्याची एक प्रत शेतकऱ्यांना देणे गरजेचे असते. मात्र जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पंचनामाची प्रत मिळालेली नाही. विशेष बाब म्हणजे पंचनाम्यात शंभर टक्के शेतकऱ्यांचे नुकसान दाखवले असतानाही नुकसान भरपाई मात्र शंभर ते दोनशे रुपये मिळाली आहे यामुळे पिक विमा कंपन्यांचा सावळा गोंधळ स्पष्टपणे उघडकीस आला आहे.

या शेतकऱ्यांना मिळाली तोकडी नुकसान भरपाई

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हजारो रुपयांचे नुकसान झालेले असतानाही शंभर ते दोनशे रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये पिंपराळा महसूल मंडळातील उमेश बाविस्कर नामक शेतकऱ्याला कापूस पिकासाठी 120 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. विशेष म्हणजे उमेश यांची विमा संरक्षित रक्कम चाळीस हजाराची होती.

गोपाल पाटील या जळगाव महसूल मंडळातील शेतकऱ्याने मका पिकासाठी विमा काढला होता. विम्याची संरक्षित रक्कम 26200 असताना या शेतकऱ्याला मात्र 167 रुपये इतकीच नुकसान भरपाई दिली आहे.

शंकर बारी या मसावद महसूल मंडळातील शेतकऱ्याने ज्वारी पिकाचा विमा उतरवला होता. विमा संरक्षित रक्कम 24000 होती मात्र या शेतकऱ्याला अवघे 96 रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आले आहे.

राजेंद्र पाटील या भोकर महसूल मंडळातील शेतकऱ्याने सोयाबीन पिकाचा विमा उतरवला. विमा संरक्षित रक्कम 38 हजाराची मात्र प्रत्यक्ष नुकसान भरपाई 68 रुपयाची या शेतकऱ्याला देऊ करण्यात आली आहे.

जळगाव महसूल मंडळातील सुनंदा पाटील नामक महिला शेतकऱ्याने मका पिकासाठी विमा उतरवला होता. विमा संरक्षित रक्कम 26 हजाराची होती मात्र नुकसान भरपाई 225 रुपये त्यांना मिळाली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यास छत्तीस हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई, कापूस पिकासाठी 40000 रुपये, मका पिकासाठी 26000, ज्वारी पिकासाठी 24000 एवढी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 ते दोनशे रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. निश्चितच पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची या ठिकाणी थट्टा मागवण्यात आली आहे.