Ahmednagar News : टोमॅटोचे दर कोसळले, शेतकऱ्यांवर बागा मोडण्याची वेळ

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : मागील वर्षांत अनेक भागात अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वच पाणीसाठे संपुष्टात येत आहेत. अशा स्थितीत घाम गाळून घेतलेल्या भाजीपाल्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

त्यामुळे शेतकरी लावलेला भाजीपाला मोडून टाकण्याच्या तयारीत आहे. शेवगाव तालुक्यातील देवटाकळी परिसरातील पाझर तलाव व साठवण तलावातील पाणीसाठा खाली गेला आहे. नदी, नाल्यांचा पाणीसाठा कोरडा पडला आहे. शेत शिवारातील विहीर व विंधन विहिरींचे पाणी आटले आहेत.

जोहरापूर, खामगाव, हिंगणगाव, देवटाकळी, बक्तरपूर, मजलेशहर, भायगावसह परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते. परिसरात टोमॅटो, कोथिंबीर, वांगी, भेंडी, मिरची बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात.

सध्या पाणीसाठा अत्यल्प झाला असून, शेतशिवारातील भाजीपाला जगवणे शेतकऱ्यांच्या जिकिरीचे झाले आहे. सध्या टोमॅटोला बाजारात १० रुपये किलो प्रमाणेभाव मिळत आहे. भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. भाजीपाल्याचा आतापर्यंत लागलेला खर्च व आजपर्यंतच्या उत्पन्नात खर्चही निघालेला नाही.

पुढील काळात तर लागणारा खर्च कमी व्हावा, या हेतूने शेतकरी शेतीशिवारातून भाजीपाला काढून टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. विहीर, कूपनलिकेला पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष केले. टोमॅटोला बाजारपेठेत भाव मिळत नाही. त्यातच पाण्याची अडचण. टोमॅटोचे पीक यावर्षी घेतले.

या पिकाचा लावणीचा खर्च ही निघाला नाही. दोन तोडणी केली, पुढील मिळणाऱ्या तीन तोडण्या न घेण्याचे ठरवले आहे. पाण्याअभावी टोमॅटोचे पीक जळून जात आहे अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात सध्या कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बाहेरील मार्टकेटलाही माल नेण्याचा प्रयत्न केला परंतु एकंदरीत भाव पाहता व खर्च पाहता शेतकरी हतबल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe