Ahilyanagar News : तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.खरिपातील नगदी पीक अशी ओळख असलेल्या तुरीचे दर घटले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.तुरीचे पडते दर बघता शेतकऱ्यांना किमान हमीदर तरी मिळावा अशी मागणी होत आहे.
अवकाळी पावसामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हे पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागला.तुरीचे क्षेत्र कमी झाल्याने तुरीचे दर वाढतील असा विश्वास शेतकऱ्यांना होता,परंतु प्रत्यक्षात तुरीच्या दरात मोठी घसरण झाली.तुर पिकाला चांगला दर मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच तुरीचे जेमतेम आगमन होते न होते तोच तुरीचे दर कोसळले आहेत.
सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याने उत्पादन खर्चही वसूल झाला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची सारी भिस्त ही तूर या नगदी पिकावर होती,परंतु तिलाही हमीभवापेक्षा कमी भाव मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सतत हवामानात होणाऱ्या बदलाने तुरीचे एकरी उत्पादन कमी झालेले दिसून येत आहे. पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील काही भागात कापणी पूर्ण होऊन नवीन तुरीची बाजारात आवक वाढली आहे,सध्या सरासरी वाढणार आहे.
या काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.नवीन तुरीला किमान ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये दर मिळत आहे.केंद्राने तुरीला ७ हजार ५५० रुपये एवढा हमीभाव जाहिर केलाअसताना या दरापेक्षा कमी दर बाजारात मिळत आहे.
आता नवीन तूर बाजारात दाखल होत असताना हमीभावा पेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत असल्याने तूर पीक शेतकऱ्यां च्या हातावर तुरी देणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांनी तुरीला किमान हमीभाव तरी मिळावा अशी मागणी केली आहे.