१२ फेब्रुवारी २०२५ निंबेनांदूर : राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले ; परंतु प्रत्यक्षात मात्र ही साईट कधी बंद तर कधी चालू राहत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सध्या फार्मर आयडी काढण्याचे काम सुरू असून,साईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर वारंवार चकरा माराव्या लागतात.
फार्मर आयडी न काढल्यास मिळणारे अनुदान पीएम किसान,अतिवृष्टी मदत, पीकविमा यांसह इतर योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ ऑनलाइनच्या माध्यमातून देण्यात येतो; परंतु अर्ज भरण्याच्या वेळेस साईट बंद असल्याने अनेक योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते, त्यामुळे या गंभीर समस्येवर कायम तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-2025-02-12T113357.090.jpg)
फार्मर आयडी ऑनलाईन साईट सुरळीत चालत नसल्याने आयडी काढण्यासाठी समस्या निर्माण होत आहे.आधार ओटीपी येत नाही, एडिटिंग क्लिक केले की, तालुका येत नाही. गट नंबर व्हेरिफाय होत नाही.या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची गरज आहे.- संतोष मगर, सेतूचालक, शहरटाकळी.
अॅग्री स्टॅग पोर्टलला फार्मर रजिस्ट्रेशन करताना अंगठा घेऊन रजिस्ट्रेशन करता आले पाहिजे तसेच अनेक शेतकऱ्यांच्या आधारावरील माहिती अपूर्ण असल्यामुळे बहुतेक रजिस्ट्रेशन करताना अडचणी येत आहेत.तसेच काही ठिकाणी तालुका टाकण्यापासून इतर माहिती भरण्यात अडचणी येत आहेत,त्यामुळे बहुतेक शेतकरी मागे जात आहेत.त्यावरही पर्याय लवकरात लवकर निघणे आवश्यक आहे.दिवसभरात वेबसाईटवर काम करताना अडथळे येतात – प्रदीप मडके, सेतू चालक, शहरटाकळी
अनेक वेळा शासनाच्या माध्यमातून विविध लाभाच्या योजना राबविण्यात येत असतात; परंतु या साईटमुळे शेतकरी वंचित राहत आहे – पंकज पंडित, शेतकरी, शहरटाकळी