हिंदू धर्मात सण-उत्सव आणि ऋतूंना अनोखं धार्मिक आणि आध्यात्मिक स्थान आहे. याच धार्मिक चक्रातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आषाढ मास. हा महिना म्हणजे भक्ती, संयम आणि आत्मचिंतनाचा कालखंड. हा महिना पावसाळ्याची सुरुवात करतो आणि याच काळात निसर्गही नव्या जीवनाचं स्वागत करतो. पण केवळ निसर्ग नव्हे, तर मानवाच्या जीवनातही हा महिना अत्यंत महत्वाचा ठरतो.

काय टाळावे?
या महिन्याला खास बनवतं त्याचं भगवान विष्णूंशी असलेलं नातं. आषाढ शुद्ध एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेत जातात. या काळात देव झोपेत असतात, असं मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात मांगलिक कार्य जसं की विवाह, गृहप्रवेश, मुंडन वगैरे टाळले जातात. याला ‘चातुर्मास’ असंही म्हणतात, जे चार महिन्यांचे व्रत आणि संयमाचं प्रतीक आहे.
दान करायच्या वस्तु-
आषाढ महिन्याचं एक विशेष आकर्षण म्हणजे या महिन्यात केलेलं दान. धार्मिक दृष्टिकोनातून, या काळात केलेलं दान अनेक पटींनी पुण्य वाढवतं. विशेषतः गूळ, मीठ, धान्य, छत्री, तांबे-पितळेची भांडी, कपडे आणि पाण्याची भांडी गरजू लोकांना दिल्यास केवळ त्यांच्या जीवनातच नव्हे, तर आपल्या कर्मसंचितातही समाधानाची भर पडते. आषाढात गरिबांना पाणी पाजणे, त्यांच्या अन्नाची व्यवस्था करणे, ही केवळ दयाळूपणाची नव्हे, तर धर्माच्या मार्गावरची एक पावती ठरते.
या महिन्यात दररोज ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा 108 वेळा जप करणे, ही एक साधी पण प्रभावी आध्यात्मिक साधना मानली जाते. यामुळे मनाची स्थिरता, घरातील शांतता आणि आंतरिक समाधान वाढते. विष्णू उपासना, एकादशीचे व्रत आणि तुळशीची सेवा या सगळ्या गोष्टी जीवनात चांगले बदल घडवू शकतात. विशेषतः, तुळशीला दररोज पाणी घालणे आणि 108 पिवळ्या धाग्यांच्या गाठी बांधणे हे उपक्रम विवाहातील अडथळे दूर करतात, असं मानलं जातं.
‘हे’ पदार्थ खाऊ नका
याउलट, काही गोष्टी आषाढात टाळाव्यात असं शास्त्र सांगतं. तामसी अन्न म्हणजे कांदा, लसूण, शिळं अन्न यांचे सेवन न करण्याचा सल्ला आहे. कारण या अन्नामुळे शरीर आणि मनावर ताण वाढतो. तसेच झाडांची तोडफोड, अनावश्यक हिंसा, क्रोध किंवा नकारात्मकता यापासून दूर राहणं हेही महत्त्वाचं आहे. कारण हा काळ केवळ शरीरशुद्धीचा नव्हे, तर मनशुद्धीचाही आहे.
एकंदरीतच, आषाढ महिना म्हणजे साधनेसाठी, संयमासाठी आणि निस्वार्थ भावनेने दान करण्यासाठी एक पवित्र संधी असलेला महिना असतो.