सध्या मोबाईलवरून काही मिनिटांत रेल्वेचं तिकीट बुक करणं जसं सोपं झालं आहे, तसंच काही नियमांचं पालन न केल्यास तेवढंच कठीणही होऊ शकतं. IRCTC च्या माध्यमातून लाखो लोक रोज ट्रेनचं तिकीट काढतात. त्यामध्ये कन्फर्म बुकिंग ही एक अशी सुविधा आहे, ज्यामुळं अचानक प्रवास ठरलेल्यांसाठी एक मोठा दिलासा मिळतो. पण आता या सुविधेचा वापर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा बदल जाहीर केला आहे आणि तो आहे IRCTC खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करणं.

ही नवी अट 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजेच, जर तुमचं IRCTC अकाऊंट आधारशी जोडलेलं नसेल, तर त्या तारखेनंतर कन्फर्म तिकीट बुक करणं शक्य होणार नाही. ही बातमी सर्वसामान्य प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक प्रवासी तात्काळ कोट्याचा आधार घेत असतात, विशेषतः जे ऑफिसमुळे किंवा वैयक्तिक कारणांनी शेवटच्या क्षणी प्रवास करतात. आता जर वेळेत ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर प्रवास करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
15 जुलैपासून नवीन अट
पण एवढ्यावरच हे नियम थांबत नाहीत. 15 जुलैपासून IRCTC ने आणखी एक अट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, दरवेळी बुकिंग करताना आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आणि तो टाकल्याशिवाय बुकिंग पूर्ण होणार नाही. त्यामुळे यापुढे फक्त लॉगिन करून झटपट तिकीट बुक करणं शक्य होणार नाही, तर प्रत्येक वेळेस तुमच्या आधाराशी लिंक असलेल्या नंबरवर आलेला OTP द्यावा लागेल.
या सगळ्या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे दलालांची बनावट ओळख वापरून केलेली तिकीट ब्लॉकिंग थांबवणं. अनेकदा पाहायला मिळतं की तात्काळ कोट्याची तिकिटं काही मिनिटांत संपून जातात. कारण दलाल संगणकाचा आणि बनावट खात्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर तिकीटं आधीच घेऊन टाकतात. यामुळे सामान्य प्रवाशाला प्रवासासाठी आवश्यक असलेली तिकिटं मिळत नाहीत. आधार पडताळणीमुळे आणि प्रत्येक बुकिंगवेळी OTP लागल्यामुळे आता या गैरप्रकारांना मोठा अडथळा येणार आहे.
आधार लिंक कसं कराल?
जर अजूनही तुमचं IRCTC खाते आधारशी लिंक नसेल, तर काळजी करू नका. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा, ‘प्रोफाइल’मध्ये जाऊन ‘Add Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा, आणि तुमचा आधार क्रमांक टाका. लगेचच आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल तो टाकून केवायसी पूर्ण करता येईल. पण हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आधार कार्ड सध्याच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर जुना असेल आणि त्यावर OTP येत नसेल, तर आधी तो अपडेट करणं गरजेचं आहे.
त्यामुळे 1 जुलै आणि 15 जुलै या दोन तारखा लक्षात ठेवा आणि त्याआधीच तुमचं IRCTC खाते आधारशी लिंक करून ठेवा. वेळेत खबरदारी घेतली, तर पुढे तुमच्या प्रवासात अडचणी येणार नाहीत.